करोडोंच्या जमिनींची कवडीमोलाने विक्री
By Admin | Updated: August 27, 2015 23:36 IST2015-08-27T23:36:23+5:302015-08-27T23:36:23+5:30
गणपतीपुळे परिसर : जमीन खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे चित्र

करोडोंच्या जमिनींची कवडीमोलाने विक्री
गणपतीपुळे : कोकणात पर्यटनाचे वारे वाहू लागल्यापासून कोकणातील समुद्रालगतच्या जमिनींबरोबरच ज्या गावात समुद्रच नाही, अशा गावातील जमिनीलासुद्धा चांगली किंमत येऊ लागली आहे. मुंबई, पुणेबरोबरच राज्याबाहेरील लोकांनीसुद्धा जमिनीत गुंतवणूक सुरु केल्याने गणपतीपुळेसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाबरोबरच नजीकच्या गावांमधूनही जमिनींचे बिनशेती करणारे (विकासक) व्यवसायात उतरल्याचे दिसून येत आहे.रत्नागिरीपासूनच्या काही बड्या अधिकाऱ्यांनीही एजंटामार्फत येथील परिसरात गुंतवणूक केली आहे. मात्र, एंजटांना विकासक आणि गुंतवणूकदार यांच्याकडून पैसा मिळतो, त्या प्रमाणात स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या जमिनींचा मोबदला मिळत नाही, याला कारणेही तशीच आहेत.येथील अनेक जागांचे नकाशे हे रत्नागिरी येथील भूमी अभिलेख कार्यालयात जीर्ण स्वरुपात असल्याचे सांगितले जाते. अनेक नकाशे हे गहाळ झाल्याने मिळत नाहीत. त्यामुळे अशिक्षित तसेच कागदपत्रांची माहिती नसलेल्या सुशिक्षित लोकांना भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार खेपा मारुनही बऱ्याचदा परतच पाठवले जाते. या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, अशी कारणेही सांगितली जातात. या कारणाने एखाद्या जागेचा नकाशा न मिळाल्यास संबंधित असलेली जागा मोजू किंवा शोधू शकत नसल्याने करोडो रुपये किमतीच्या जागेची किंमत शून्य होऊन जाते. अशावेळी सराईत असणारे गावातीलच एजंट तेथील तलाठ्यांना हाताशी धरुन तलाठी कार्यालयामध्ये असलेल्या जुन्या नकाशावरुन नवीन नकाशे बनवून घेतात आणि शेतकऱ्यांकडून कवडी मोलाने जागा विकत घेतात. संधी मिळताच बड्या पैसेवाल्याला जागांची विक्री करतात. याकामी काही तलाठीही एजंटचे काम करत असून, आपल्याकडील अनेक जुने नकाशे एजंटांशिवाय तसेच स्वत:ला मोठे कमिशन मिळाल्याशिवाय अन्य कोणालाही देत नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांची फसवणूक सुरु असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे समितीच्या व्यवहारांशी गुंतलेले काही शासकीय कर्मचारी व अधिकारी या भागातून आपली बदली होऊ नये म्हणून गावातील नेत्यांना हाताशी धरुन लोकांची निवेदने शासनाकडे पाठवतात. ग्रामसभेमध्ये तसा ठराव करुन घेण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला ही मंडळी तयार असतात.सर्व तलाठी कार्यालयांमधील जुने नकाशे भूमी अभिलेख कार्यालयात जमा करुन ते व्यवस्थितरित्या जतन केल्यास स्थानिक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक व लूट थांबवू शकते. पण याकडे लक्ष कोणी द्यायचे. (वार्ताहर)++
काही बड्या अधिकाऱ्यांनीही एजंटांमार्फत येथील परिसरात केली गुंतवणूक.
अनेक जागांचे नकाशे हे रत्नागिरी येथील भूमी अभिलेख कार्यालयात जीर्ण स्वरुपात.
बहुतांश नकाशे गहाळ झाल्याने मिळत नाहीत.
शेतकऱ्यांपुढे पेच.