मतांच्या जोगव्यासाठी...
By Admin | Updated: October 9, 2014 23:01 IST2014-10-09T22:43:09+5:302014-10-09T23:01:03+5:30
गुहागरवर नजरा : सर्वांकडून जाहीरनाम्याद्वारे प्रयत्न

मतांच्या जोगव्यासाठी...
गुहागर : गुहागर मतदारसंघात होणाऱ्या चौरंगी लढतीमध्ये भास्कर जाधव यांनी मागील पाच वर्षातील विकासकामे, राबवलेल्या विविध योजना, भाजपकडून विनय नातू यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून केलेली विकासकामे व भविष्यातील येणारी मोदी लाट, शिवसेनेचे विजय भोसले यांनी पर्यटन केंद्र व लघु उद्योगावर भर दिला, तर काँग्रेसचे संदीप सावंत यांनी एकमेव भास्कर जाधव विरोधक आहेत, अशा विविध पद्धतीने जाहीरनामा करत मतांचा जोगवा मागितला जात आहे.
केंद्र सरकार भाजपचे असल्याने येथेही भाजपची सत्ता आल्यास मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो, हे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपचे विनय नातू यांनी सुरु केला आहे. याचबरोबर चिरेखाण व हातपाटी वाळू व्यवसायाला परवाना मिळवून देणे, बेरोजगारीचा प्रश्न मिटविण्यासाठी रत्नागिरी गॅस प्रकल्प, भारती शिपयार्ड कंपनी सुरु करणे, मच्छिमारांना महिन्याला डिझेल परवाना, मगरींकरिता संरक्षित तलाव, मच्छी उतरविण्यासाठी आवश्यक ठिकाणी छोटे धक्के तसेच एमआयडीसी प्रकल्पासाठी पर्यटन व फलोत्पादनासाठी उपयुक्त १४ गावाचे भूसंपादन करताना लोटे औद्योगिक प्रकल्पातील अधिकची जागा कशाला? असा सवाल करत प्रचार सुरू केला आहे.
शिवसेनेचे विजय भोसले यांनीही रत्नागिरी गॅस प्रकल्प सुरु करण्याबरोबरच येथे पर्यटन व्यवसाय व लघु उद्योगांना चालना देणार असल्याचे सांगितले. एमआयडीसी प्रकल्पाला जनतेचा विरोध असल्याने आपणही जनतेबरोबर राहणार असल्याचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला आहे.
राज्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व कामगारमंत्री होऊनसुद्धा आपण एक शेतकरी कुटुंबातील असून आजही गावातून उत्सवातून मिसळणारे आहोत, असे सांगत लोकसभेमध्ये भाजपकडून ‘सोशल मीडिया’चा झालेला प्रभावी वापर लक्षात घेऊन अशा खोट्या अफवांना मतदारांनी बळी पडू नका. मी केलेली मतदार संघातील कामे जनसंपर्काच्या कसोटीवर तपासून पहा, आणि मगच आपले मत कोणाला द्यायचे, ते ठरवा, असे भास्कर जाधव यांनी सुचित केले आहे.
काँग्रेसचे राणेसमर्थक असलेले संदीप सावंत यांनी भास्कर जाधव यांच्या विरोधात एक कलमी प्रचार सुरु केल्याचे चित्र आहे. तालुक्यातील रत्नागिरी गॅस प्रकल्प, होऊ घातलेला एमआयडीसी प्रकल्प व पर्यटन या प्रमुख मुद्द्याभोवती उमेदवारांचा जाहीरनामा केला आहे. या जाहिरनाम्यावरही मतदारांचे लक्ष असणार आहे. (प्रतिनिधी)
गुहागर मतदारसंघात सर्व पक्षांच्या उमेदवारांचे जाहीरनामे जाहीर.
भास्कर जाधवांचा विकासकामांवर भर...
लाटेवर आरूढ होण्याचा नातू यांचा प्रयत्न.
पर्यटन व लघु उद्योगावर भोसले यांचे लक्ष.
संदीप सावंत यांचा जाधव यांना तीव्र विरोध.
गुहागरचे रण तापल्याने कार्यकर्त्यांकडून जनसंपर्क.
महसूलविषयक प्रश्न व विविध माध्यमातून कार्यकर्ते जात आहेत गावागावात.
रत्नागिरी गॅसचा प्रश्नही पुढे.
जनतेबरोबर राहणार असल्याचे म्हणतात उमेदवार.
महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी करताहेत निवडणूक मुद्दा.
प्रचार तापलाय आता प्रतीक्षा ‘त्या’ दिवसाची.
यंदा विकासाभोवती फिरतेय गुहागरची निवडणूक.
सोशल मीडियावर चर्चा.