एस. टी. महामंडळाने दुकानेगाळे भाडे माफ करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:48+5:302021-07-03T04:20:48+5:30
राजापूर : लॉकडाऊनमुळे एस. टी. वाहतूकही बंद झाली. त्याचा परिणाम एस. टी. आगारातील भाडेतत्वावर असलेल्या व्यावसायिकांनाही बसला आहे. अशा ...

एस. टी. महामंडळाने दुकानेगाळे भाडे माफ करावे
राजापूर : लॉकडाऊनमुळे एस. टी. वाहतूकही बंद झाली. त्याचा परिणाम एस. टी. आगारातील भाडेतत्वावर असलेल्या व्यावसायिकांनाही बसला आहे. अशा परिस्थितीत एस. टी. महामंडळाने दुकानगाळे भाडे माफ करावे, अशी मागणी राजापूर आगारातील छोट्या व्यावसायिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन विभाग नियंत्रक यांच्याकडे देण्यात आले आहे.
एप्रिल ते जून हा एस. टी. प्रवाशांचा गर्दीचा हंगाम असतो. याचकाळात लॉकडाऊन लागल्याने आमच्या व्यवसायांना त्याचा फटका बसला आहे. एस. टी. आगारातील गर्दी रोडावल्याने आमचे व्यवसायही जेमतेम सुरू होते. अशा परिस्थितीत नोकरांचे पगार, वीजबिल, विविध कर भरणे कठीण बनले आहे. प्रसंगी कर्ज काढून हा खर्च भागवावा लागणार आहे. या साऱ्या परिस्थितीतून आमच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत एस. टी. महामंडळाकडून आकारण्यात येणारे व आम्ही दरमहा अदा करत असलेले भाडे भरणे मुश्कील बनले आहे. या साऱ्या परिस्थितीचा विचार करून लॉकडाऊन असेपर्यंत व एस. टी. वाहतूक पूर्ववत सुरळीत होईपर्यंत दुकानगाळे भाड्यातून सूट देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर निशांत भोगटे, अनंत हर्याण, विलास गावकर, सदानंद धालवलकर, प्रभात पाध्ये, शशिकांत अमरे, किसन मयेकर यांच्या सह्या आहेत.