एस. टी.ची बलस्थाने प्रवाहित करा : प्रसाद उकर्डे
By Admin | Updated: August 1, 2014 23:21 IST2014-08-01T22:13:42+5:302014-08-01T23:21:20+5:30
प्रवासी वाढवा अभियान : रत्नागिरी विभागात अभियानाची सुरूवार्त

एस. टी.ची बलस्थाने प्रवाहित करा : प्रसाद उकर्डे
रत्नागिरी : सर्वसामान्य माणसांचा शासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. वर्षभर काम करीत असताना विविध आव्हानाना सामोरे जावे लागते. रस्ता तिथे एस. टी. नेत असताना कमी भारमानातही फेरी सुरू ठेवावी लागते. एस. टी. व्यावसायिकदृष्ट्या फायद्यात किंवा उर्जितावस्थेत आणण्यासाठी बलस्थाने प्रवाहीत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे रत्नागिरी विभागात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रवासी वाढवा’ अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात प्रांताधिकारी उकार्डे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष देव, विभाग नियंत्रक के. बी. देशमुख, विभागीय वाहतूक अधिकारी बी. के.कुरतडकर, लेखाधिकारी संदीप हर्णे, आगार व्यवस्थापक एस. एम. सिनकर आदी उपस्थित होते.
सुरक्षित, वक्तशीर व किफायतशीर प्रवास करणे गरजेचे आहे. चालकाने चालकाची तर वाहकाने पालकाची भूमिका बजावणे गरजेचे आहे. तसेच सौजन्य, स्वच्छता व व्यावसायिकता यामध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याचे उकर्डे यांनी सांगितले.
कुरतडकर यांनी करून अभियानाचा उद्देश विषद केला. वाहक, चालकांनी प्रवाशांशी विनम्रपणे वागण्याची आवश्यक असून, प्रत्येक थांब्यावरील प्रवाशाला बसमध्ये घेण्याची सूचना महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी विभागीय संघटनेचे खजिनदार संदीप भोंगले यांनी केली.
प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकीय, सामान्य दृष्टीकोन बाळगणे गरजेचे आहे. कोणतेही क्षेत्र समाजाचे प्रतिबिंब असते. सार्वजनिक उपक्रम राबविताना प्रामाणिक व व्यावसायिक पध्दतीने करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सध्या एस.टीला स्पर्धक निर्माण झाला असल्याने सजग राहणे आवश्यक असल्याच्या सूचना केल्या.सध्या एसटीला स्पर्धक निर्माण झाला असल्याने त्यानाही या स्पर्धेत उतरावे लागेल असे आवाहन यावेळी करण्यात आले. देशमुख यांनी वाहक चालकांनी विश्वासार्हता वाढवितानाच सौजन्याची वागणूक देणे आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांने कामावरील निष्ठा ठेवून स्वयंस्फूर्तीने अभियान राबविले तर ते नक्की कायम टिकेल, असे सांगितले.
सूत्रसंचलन राजलक्ष्मी सुर्वे यांनी तर आभारप्रदर्शन आगारव्यवस्थापक एस.एम.सिनकर यांनी केले. (प्रतिनिधी)