साडेसहा कोटी अनुदान अखर्चित
By Admin | Updated: December 4, 2014 23:38 IST2014-12-04T22:52:32+5:302014-12-04T23:38:48+5:30
देयके रखडली : दोन वर्षे उलटली तरी अंगणवाड्यांसाठीचा निधी पडून

साडेसहा कोटी अनुदान अखर्चित
रहिम दलाल - रत्नागिरी -ग्रामीण भागातील ३४१ अंगणवाड्यांची कामे पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली तरी देयके अदा न झाल्याने ६ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे़ हा निधी खर्च करण्यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी वेळोवेळी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून पाठपुरावा करुनही राज्य शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले
आहे़
जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी २८९५ अंगणवाड्या मंजूर असून, २८४१ अंगणवाड्या कार्यरत आहेत़ त्यामध्ये नियमित २२५६ व ५८५ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे़ जिल्ह्यातील १३६५ अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत़ त्यामुळे काही अंगणवाड्या खासगी इमारतीमध्ये, प्राथमिक शाळेच्या खोलीमध्ये, तर काही अंगणवाड्या सध्या समाजमंदिरात भरविण्यात येतात़
या अंगणवाड्यांसाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती असणे आवश्यक आहे़ त्यासाठी जिल्हा नियोजनमधून कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यास तयार आहे़ मात्र, अंगणवाड्या बांधकामासाठी ग्रामीण भागामध्ये जमीनमालक जागा देण्यास तयार होत नसल्याने इमारती कशा बांधणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़
सुरुवातीला अंगणवाडी बांधकामासाठी ३ लाख ५० हजार रुपये देण्यात येत होते़ त्यामध्ये वाढ होऊन ४ लाख ५० हजार रुपये झाले़ त्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ झाल्याने आता अंगणवाडीची इमारत बांधकामासाठी ६ लाख रुपये अनुदान देण्यात येते़ मात्र, ज्या ३४१ अंगणवाड्यांच्या इमारती बांधण्यात आल्या होत्या, त्या प्रत्येक इमारतीसाठी ४ लाख ५० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते़
यामध्ये जिल्हा वार्षिक योजना, नाबार्ड आणि तेराव्या वित्त आयोगातून ही कामे घेण्यात आली होती़ या इमारतींच्या कामांना मंजुरी देण्यात आली़ ही कामे ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आली़ या कामांचा काही निधी देण्यात आला़ मात्र, अजूनही निधी देणे शिल्लक आहे़
या कामांसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे ६ कोटी ४५ लाख रुपये अनुदान आले होते़ अंगणवाड्यांच्या इमारतीची कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनुदान संबंधितांना देणे आवश्यक होते़ मात्र, हे अनुदान गेली दोन वर्षे अखर्चित राहिले आहे़
महिला व बालकल्याण विभागाकडून हे अनुदान खर्ची घालण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे़ मात्र, या इमारतींची कामे वेळेवर करण्यात आली नसल्याचा ठपका शासनाकडून ठेवण्यात आला आहे़ त्यामुळे शासनाकडून हे अनुदान खर्ची घालण्यास अडकाठी आणली जात आहे़ त्यामुळे गेली दोन वर्षे हे अनुदान अखर्चित राहिले आहे़ शासनाने आतातरी या रखडलेल्या अनुदानाबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी ठेकेदारांकडून करण्यात येत आहे.
शासनाचे दुर्लक्ष...
अंगणवाड्यांची कामे पूर्ण होऊन त्यामध्ये बालकांचा किलबिलाट सुरु आहे़ अंगणवाड्या सुरु होऊनही बांधकामाचा खर्च न मिळाल्याने ग्रामपंचायतींकडून ओरड सुरु आहे़ मात्र, महिला व बालकल्याण विभागाकडून हा निधी खर्ची घालण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरुच आहे़ मात्र शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने हा निधी अखर्चित राहिला असून त्यामुळे इमारती बांधल्यानंतर दोन वर्षांनीही निधी अखर्चितच राहिला आहे.