पावसाची दमदार गर्जना
By Admin | Updated: September 16, 2015 00:48 IST2015-09-16T00:47:12+5:302015-09-16T00:48:25+5:30
रत्नागिरी जिल्हा : उत्सवी वातावरणाला मुसळधार सरींनी आणला उत्साह

पावसाची दमदार गर्जना
रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून परतीच्या पावसाने पुन्हा दमदार सलामी दिली असून, रात्रीपासून संततधार सुरू आहे. आज (मंगळवार) दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
गुरुवारपासून परतीच्या पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने सोमवारी सायंकाळपासून मेघगर्जनेसह जोरदार सुरुवात केली आहे. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. सकाळी थोड्याशा विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सुरू झाला. शहरातील अनेक भागात गटारांचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करीतच वाहने चालवावी लागत होती. सकाळी सुमारे दीड तास शहरातील वीजपुरवठा गायब होता. दुपारनंतर मात्र थोडीशी उघडीप घेतली होती. त्यामुळे तासभर नागरिकांना सूर्यदर्शनही झाले.
सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरला होता. आज दिवसभर पावसाचे रिमझिम, तर मध्येच मुसळधार बरसणे सुरूच होते. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. गतवर्षी या दिवशी २.४८ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता, तर आज २३.८३ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला. मात्र, गतवर्षी या दिवशी झालेल्या एकूण पावसाची नोंद ३३२३.३३ मिलिमीटर होती. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने १ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाची केवळ २०३५ मिलिमीटर इतकीच नोंद झालेली आहे. परतीचा पाऊस सलग चार दिवस मुसळधार पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असला तरी आतापर्यंत सरासरी सुमारे १३०० मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)