मंडणगड तालुक्यातील रस्ते दयनीय

By Admin | Updated: February 19, 2015 23:46 IST2015-02-19T22:47:30+5:302015-02-19T23:46:58+5:30

मायनिंगमुळे अडचण : दुरूस्ती नसल्याने विकास रखडल्याचा आरोप

Roads in Mandangad taluka are pathetic | मंडणगड तालुक्यातील रस्ते दयनीय

मंडणगड तालुक्यातील रस्ते दयनीय

देव्हारे : मंडणगड तालुका हा विकासाच्या बाबतीत अजूनही खूप मागे आहे़ तालुक्यातील गावांच्या रस्त्याची अथवा पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही प्रश्न तातडीने सुटत नसले, तरी या समस्यांना विविध मार्गाने समस्यामुक्त करण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून झाल्यास तालुक्याचा विकास दूर राहणार नसल्याचे चित्र आहे.
मंडणगड तालुक्यात सुरू असलेल्या खाण प्रकल्पांच्या उभारमीसाठी या भागातूनच दळणवळ केले जाते. मात्र अशा वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे. चिंचघर ते आंबवली साखरी रस्ता, उमरोली ते गुडेघर रस्ता व सध्या उमरोली येथे जेठी सुरू झाली असल्याने, शिपोळी ते उमरोली, गुडेघर रस्ता सध्या दयनीय अवस्थेत आहे. या मायनिंग कंपन्यांच्या वाहतूकीने बाणकोट पंढरपूर मार्गावरूनही वाहतूक करून रस्त्यांच्या सुशोेभिकरणास मदत केली होती. गेल्या अनेक वर्षापासून आशापुरा माईनकेम कंपनी बॉर्क्साडच्या कच्च्या मालाचे उत्खनन करीत आहे़ यामध्ये साखरी, गुडेघर, उंबरशेत या ठिकाणांचा समावेश आहे. उत्खनन केलेला कच्च्या मालाची वाहतूक ही डंपरच्या सहाय्याने केली जाते. डंपरमध्ये पंधरा ते वीस टन माल भरून, या गाडया रात्रं दिवस भरभरून वाहतूक करत असतात. त्यामुळे रस्त्यांची चाळण झालेली दिसत आहे. कधी काळी डांबरीकरण झालेले रस्ते आज लाल मातीचेही असल्याचे दिसत नाहीत़ रस्त्यांमधील दगड वर येऊन खाच खळग्याचे सामान्य या रस्त्यांवर पहावयास मिळते. सध्या या रस्त्यांवरून छोटी वाहने चालवणे म्हणजे सर्कस केल्यासारखे वाटते़ अशी दयनीय अवस्था रस्त्यांची झालेली आहे़ सदर मायनिंग कंपन्यांकडून मायबाप सरकार कर घेते. मात्र, त्या कंपन्यानी अवजड वाहनांनी केलेल्या वाहतुकीमुळे रस्ता खराब होतो. या गोष्टीकडे मात्र कोणीही बघत नाहीत. ग्रामीण भागातील जागा, ग्रामीण भागामधे जाणारे रस्ते, ग्रामिण भागातील लोकांचेही सरकाऱ मग ग्रामीण भागातून सरकारला मिळणारा कररूपी पैसा, ग्रामीण भागातील रस्त्यांच्या उपयोगामध्ये येणे आवश्यक आहे का? तो सर्व पैसा नाही, त्यातील अर्धा तरी शासनाने त्या खराब होणाऱ्या रस्त्यांसाठी वापरावा का ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो़ उंबरशेत मायनिंग कंपनी उत्खनन करत असलेला माल, साखरी जेठीवरून जातो. गेली अनेक वर्ष या रस्त्यांवरून वीस वीस टनाची वाहतूक करणाऱ्या असंख्य डंपरमुळे या गावाला जोडणारा रस्ता कधी डांबरी होता़, ही बाब आज शोधूनही सापडणार नाही. तीच अवस्था गुडेघर उमरोली रस्त्याची़ हा रस्ताही पूर्णपणे डांबरीकरण मुक्त झालेला आहे़ शासनाने त्वरित लक्ष घालून या रस्त्यांची दुरूस्ती करावी अशी मागणी करण्यात येत असल्याने आता प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.


सुटणार कधी
मंडणगड तालुक्यात सध्या मायनिंगकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढत असून, अशा रस्त्यांना दळणवळणासाठी अधिक सुविधा हव्यात. रस्ते सुधारले तर गावचा विकास होईल, हे खरे असले तरी दयनीय अवस्थेत असलेल्या रस्त्यांना नवसंजिवनी कोण देणार, अशा प्रश्न विचारला जात आहे. या भागात गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न आता सुटणार कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Roads in Mandangad taluka are pathetic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.