क्रांतिकारकांच्या कथा इतिहासातून हद्दपार

By Admin | Updated: October 16, 2015 00:04 IST2015-10-15T21:18:15+5:302015-10-16T00:04:25+5:30

श्रीनिवास पेंडसे : श्री दुर्गादेवी देवस्थान गुहागरतर्फे व्याख्यान; इतिहासाच्या स्मृती जागवल्या

Revolutionary History | क्रांतिकारकांच्या कथा इतिहासातून हद्दपार

क्रांतिकारकांच्या कथा इतिहासातून हद्दपार

गुहागर : क्रांतिकारकांच्या प्रेरणादायी कथा आज इतिहासातून हद्दपार झाल्या आहेत. ज्यांच्यामुळे आपण जगलो त्यांचे स्मरण आम्हाला नाही. अनंत कान्हेरे हे आयनी येथील थोर क्रांतिकारी आपल्या जिल्ह्यातील अनेकांना माहित नाहीत, अशी खंत व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांनी व्यक्त केली.
श्री दुर्गादेवी देवस्थानच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘क्रांतिकारक अनंत कान्हेरे’ यांच्या जीवनावर आधारीत व्याख्यानातून ते बोलत होते. या व्याख्यान मालेचे उद्घाटन व दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देवस्थानच्यावतीने ठेवण्यात आलेल्या हुंडीचे (दानपेटीचे) उद्घाटन नगराध्यक्ष जयदेव मोरे व चिपळूण अर्बन बँकेचे संचालक अजय खातू यांच्या हस्ते झाले.
पेंडसे म्हणाले की, अनंत कान्हेरे हे मूळचे आयनी गावचे त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदूर, औरंगाबाद, बार्शी येथे झाले. मदनलाल धिंग्रा यांच्या क्रांतीकारी कार्यातून पे्ररीत होऊन मला मदनलाल धिंग्रा व्हायचंय, ब्रिटीशांविरोधात लढायचं, असा निश्चय केला. शरीर कमावलं यासाठी परीक्षा म्हणून गंगाराम मारवाडी सराफाने त्यांचा पायावर निखाऱ्याप्रमाणे तापलेली कानस टेकली. पेटत्या दिव्याची कास हातात धरायलाही लावली. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर तसूभरही वेदना दिसून आल्या नाहीत. उलट तो मारवाडीच हे सर्व पाहून रडू लागला. याचवेळी त्यांचं क्रांतीकारक बनणं निश्चित झालं होतं. क्रांतीचे कार्य करताना आपल्या प्राणाचे बरेवाईट होईल, म्हणून आपल्या आई - वडिलांना मृत्यूनंतर आपला फोटो पाहता यावा, म्हणून चित्रकाराकडून फोटो काढून घेतला.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला देशातील इंग्रजांविरोधातील लढा तीव्र होत होता. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक होणे. नाशिक येथील क्रांतिकारी प्रवचनकार तांबे शास्त्री यांच्या प्रवचनावर बंदी, अशा अनेक संतापजनक घटना एकामागोमाग एक घडत होत्या. त्यावेळी लंडनमधून सावरकरांनी २८ पिस्तूलं पाठवली होती. यामधील ७ कान्हेरेंपर्यंत पोहोचली. नाशिकच्या जॅक्सन नामक कलेक्टरने अनेकांवर अन्याय केले होते. या जॅक्सनचा खून करण्याचे नियोजन कान्हेरेंनी सुरू केले. औरंगाबाद ते नाशिक यासाठी तीनवेळा बेत फसला. जॅक्सनला चांगल्या कामाबद्दल कमिशनर करण्यात आले. तेव्हा जॅक्सन अन्य ठिकाणी जाणार म्हणून त्याचे आवडते संगीत नाटक ‘शारदा’चे विजयानंद थिएटरमध्ये आयोजन करुन मारण्याचा प्लॅन आखण्यात आला. त्यांच्या जोडीला विनायक देशपांडे, अण्णा कर्वे हेही होते. कान्हेरेंनी जॅक्सनला सात गोळ्या झाडून मारले.
जॅक्सनचा वध करण्यासाठी माझी नेमणूक भारत मातेने केली. त्याने माझ्या मातेच्या शरीराची हानी केली, अशा शब्दात न्यायालयात कान्हेरेंनी जॅक्सनच्या हत्येची ठणकावून कबूली दिली. या प्रकरणामध्ये पिस्तूल पुरवल्याबद्दल सावरकरांना लंडनमध्ये अटक झाली. २० मार्च १९१० रोजी कान्हेरेंसह अन्य दोघांना फाशी ठोठावण्यात आली. यावेळी तत्कालीन न्यायाधीश यांनी ध्येयवेड्या या तरुणाला फाशीची शिक्षा देताना वाईट वाटत आहे, अशी खंत व्यक्त केली. यावेळी किरण खरे, संतोष मावळणकर, डॉ. आनंद खरे, अतुल फडके, गणेश भिंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

आज कान्हेरेंच्या जीवनावर मराठीत फक्त दोनच पुस्तके उपलब्ध आहेत. एकाही लेखकाला हा साहित्याचा विषय वाटला नाही. आज अनेक वर्षे गेली तरी जन्मगाव असलेल्या आयनी रेल्वे स्टेशनला मागणी असूनही कान्हेरेंचं नाव दिलेले नाही. स्वातंत्र्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या वंदे मातरम्ला पहिल्यासारखे स्थान जनमानसात नाही, अशी खंत पेंडसे यांनी व्यक्त केली.

Web Title: Revolutionary History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.