‘महसूल’ची लक्तरे वेशीवर!
By Admin | Updated: September 22, 2015 23:54 IST2015-09-22T21:06:04+5:302015-09-22T23:54:39+5:30
राजापूर तालुका : लाचखोर घटनांनी आली भोवळ

‘महसूल’ची लक्तरे वेशीवर!
राजापूर : मागील काही दिवसात जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत पाचपैकी तीन प्रकरणे राजापुरातील आहेत. त्यामध्ये तहसीलदारांसह मंडल अधिकारी व तलाठी यांचा समावेश आहे. त्यामुळे महसूलच्या या भ्रष्ट कारभाराने राजापूरच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.राजापूर तालुका महसूल विभागाचा एकूणच कारभार भ्रष्टाचाराने माखला असल्याचे या तीन कारवाईतून पुढे आले आहे. सर्वसामान्य जनतेसाठी निगडीत असलेल्या महसूल प्रशासनाची ओळख गतिमान शासन अशी वारंवार केली जाते. मात्र, गैरव्यवहार व भ्रष्टाचार यातच राजापूरचे प्रशासन माहीर बनले आहे.तालुक्यात जमीन खरेदी - विक्री व्यवहारात गोरगरीब शेतकऱ्यांची सातत्याने पिळवणूक झाली असून, नाहक त्यांच्यावर अन्यायच झाला आहे. कागदपत्रातील केलेल्या चुका जनतेला भोगाव्या लागत आहेत. विविध प्रकारची उत्खनने, त्यासंदर्भात असलेल्या रॉयल्टी याबाबतचे व्यवहार संशयास्पद राहिले असून, अशा प्रकरणात दंडाची होणारी आकारणी यातसुद्धा पारदर्शकता नसल्याचेच अनेकवेळा पुढे आले आहे. याबाबत कुणीच जबाबदारीने काम करायला तयार नाही की, जाणूनबुजून चुका केल्या जातात. मात्र, अशा अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला देखील टाळाटाळच करण्यात आली असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.
या सर्व कामादरम्यान काही एजंट मात्र सातत्याने तहसील कार्यालयाच्या आवारात घुटमळत असतात. त्यांच्याकडून जमीन व्यवहारांची प्रकरणे दाखल करून केसीसबाबत सातत्याने हस्तक्षेप चालतो, असे आरोप सातत्याने होत आहेत. दुसरीकडे विविध प्रकारचे दाखले जनतेला वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. कुठल्याही दाखल्यावर सह्या करण्यासाठी पैसे घेतले जातात. पैसे मिळाल्याशिवाय कोणत्याही दाखल्यावर सही होत नाही, असे विदारक चित्र आहे. परिणामी जनतेला वेळेवर दाखले मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून अर्जुनासह अन्य प्रकल्प असोत किंवा आंबा नुकसान भरपाई असो, जनतेला या कार्यालयाकडून उचित न्याय मिळालेला नाही, हेच विदारक वास्तव पुढे आले आहे. इथेदेखील एजंटाशिवाय सरकारी कागद पुढे सरकत नसल्याचे अनेकवेळा सिद्ध होऊनही जनतेची होत असलेली फसवणूक रोखण्यासाठी कुणीच प्रयत्न केलेले नाहीत. केवळ प्रशासन नाही तर लोकप्रतिनिधींनीदेखील जनहितासाठी या समस्यांकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे लूट होत आहे.
मागील काही महिन्यात तहसीलदारांसह प्रत्येकी एक मंडल अधिकारी व तलाठी लाच घेताना सापडले. राजापूर तालुक्याच्या तहसीलदारांना दोन लाखांची लाच घेताना झालेली अटक यामुळे संपूर्ण तालुका चांगलाच हादरला आहे. मागील काही महिन्यात महसूलचे तीन अधिकारी सापडल्याने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राजापूरच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. (प्रतिनिधी)
प्रांत कार्यालयातही तेच?
केवळ राजापूर तहसील कार्यालय नाही तर दोन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या प्रांत कार्यालयाची स्थिती याहून वेगळी नाही. यापूर्वी रत्नागिरीतील प्रांत कार्यालयाकडून राजापूर तालुक्याचा व्यवहार चालायचा, त्यावेळी वेळेवर दाखले मिळत होते, पण राजापुरात हे कार्यालय सुरु झाल्यानंतर वेळेत दाखले मिळत नाहीत, हा येथील जनतेचा अनुभव बोलका आहे.