कोरोना कसोटीच्या काळात रुग्णांच्या नातेवाईकांनीही सहकार्य करावे - संघमित्रा फुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:48+5:302021-04-24T04:31:48+5:30
रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तसेच महिला रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दर दिवशी लक्षणीय वाढ होत आहे. असे असतानाही ...

कोरोना कसोटीच्या काळात रुग्णांच्या नातेवाईकांनीही सहकार्य करावे - संघमित्रा फुले
रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तसेच महिला रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दर दिवशी लक्षणीय वाढ होत आहे. असे असतानाही या रुग्णांचे नातेवाईक या परिसरात गर्दी करत आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेणे, ही जबाबदारी कोरोना रुग्णांच्या नातेवाई्कांचीही आहे. त्यामुळे त्यांनीही आरोग्य यंत्रणेला याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले - गावडे यांनी झूम ॲपद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शुक्रवारी ऑनलाईन पत्रकार परिषद आयोजित केली होती. यात जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले याही सहभागी झाल्या होत्या.
सध्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालय आवारात होणारी गर्दी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला डोकेदुखी होत आहे. या वाढत्या गर्दीमुळे या नातेवाईकांमध्ये कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांना या नातेवाईकांची गर्दी रोखताना अडचणीचे होत आहे. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून सुरक्षा अधिक कडक केली असल्याचे डाॅ. फुले यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात सध्या कोरोना रुग्ण आणि अन्य रुग्ण यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केल्यास कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याचा धोका असल्याचे यावेळी पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते असल्याचे सांगितले. त्यावर डाॅ. फुले म्हणाल्या की, रुग्णांना यातून बाहेर काढण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. अलीकडेच एका रुग्णाचा मृत्यू, तो मानसिक तणावाखाली असल्याने झाला. त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी यंत्रणेने आटोकाट प्रयत्न केले. सध्या रुग्णालयात ऑक्सिजन पाॅईंट कमी असले तरी आवश्यक वेळी सिलिंडर लावतो. रुग्णांचा संपर्क त्यांच्या घरच्यांशी राहावा, म्हणून त्यांना व्हिडीओ काॅलही करून देतो. त्यामुळे अगदी ९५ टक्के लोक यातून बाहेर पडून बरे होत आहेत.
या रुग्णांच्या नातेवाईकांनीही कोरोनाचे संकट ओळखून योग्य खबरदारी घेण्याची जबाबदारी नातेवाईकांचीही आहे. त्यांनीही यंत्रणेला सहकार्य करायला हवे, असेही डाॅ. फुले म्हणाल्या.
जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करून घेतले असून सर्व सुरक्षिततेच्यादृष्टीने २४ तास देखरेखीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
अलीकडेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती देताना डाॅ. फुले म्हणाल्या.