शाळा तपासणीवरून शिक्षकांमध्ये संताप
By Admin | Updated: July 10, 2016 01:47 IST2016-07-09T23:22:10+5:302016-07-10T01:47:39+5:30
एक दिवस शाळेसाठी : शासनाकडून शिक्षकांची चेष्टा

शाळा तपासणीवरून शिक्षकांमध्ये संताप
रत्नागिरी : ज्यांचा विद्यादानाशी कसलाही संबंध नाही, असे अधिकारी ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत जात असल्याचा आक्षेप आता शिक्षकांमध्ये जोर धरू लागला आहे. शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांऐवजी महसूल, आरोग्य आणि कृषी खात्याचे अधिकारी शाळांची तपासणी घेणार असतील, वर्ग चालवणार असतील तर अशा उपक्रमातून फक्त विद्यार्थ्यांचा एक दिवस वाया जाणार आहे, असा तीव्र आक्षेप जवळजवळ सर्व शिक्षकांमधून घेतला जात आहे. काही ठिकाणी तर चक्क तलाठ्यांकडून शाळांची तपासणी करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे महसूल खात्याच्या तपासणीचे काम शिक्षकांना द्या, अशी उपरोधिक मागणी आता शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयानुसार या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात वर्ग - १ व वर्ग -२ चे अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील प्रत्येकी एक धडा शिकविणार आहेत.
आरटीईच्या कलम २३.१ नुसार डी. एड. पदवीधारक शाळांमध्ये अध्यापन करु शकतो. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून आर.टी.ई. कायद्याला हरताळ फासण्याचा प्रकार सुरु असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिक्षकवर्गातून उमटत आहे. त्यामुळे या उपक्रमाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा गुणवत्तमध्ये किती पुढे आहेत, हे आजपर्यंत सिध्द झाले आहे. तरीही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा गुणवत्ताहीन असल्याचा समज बळावत चालला आहे. ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबवून शासनाकडून हेच दाखवून देण्यात येत आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असलेल्या जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्याची शासनाकडूनच पायमल्ली केली जात आहे, असा आक्षेप घेतला जात आहे.
वर्ग - १ व वर्ग - २ चे अधिकारी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. तर राजापूर तालुक्यातील काही शाळांमध्ये तलाठीच शाळांची तपासणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
हा शिक्षकांवर अविश्वास दाखविण्याचा प्रकार असून, अशाप्रकारे महसूल खाते, कृषी खाते, बांधकाम खाते व अन्य खात्यांमध्ये ‘एक दिवस शिक्षकांसाठी’ शासनाने ठेवल्यास त्यांची लक्तरे वेशीवर टांगली जातील, अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांकडून उमटत आहे. सोशल मीडियावरही या उपक्रमाबाबत शिक्षकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच शिक्षण खाते शाळा तपासणीसाठी अन्य खात्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन नेमके काय साध्य करणार आहे, असा प्रश्न शिक्षकांकडून केला जात आहे. महसूल विभागाचे कर्मचारी येऊन शाळेत धडे देणार असतील तर तो शिक्षकांच्या शिकवण्याच्या कलेबाबत आक्षेप घेतल्यासारखाच आहे. त्यामुळे या उपक्रमाबाबत शिक्षक संघटना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन आवाज उठविण्याच्या तयारीत आहेत. (शहर वार्ताहर)
‘शाळेसाठी एक दिवस’ हा उपक्रम सर्व शिक्षकांवर अन्यायकारक असून, शिक्षणाचा एक दिवस वाया घालविण्याचा प्रकार आहे. या उपक्रमाच्या वेळी काही अधिकाऱ्यांनी शाळांना हजेरी लावली. तर काहींनी काम सांगितले म्हणून केले. काही अधिकाऱ्यांनी तपासणीचे काम केले. तर काहींना कशासाठी पाठविले, हेच माहीत नव्हते. ज्यांनी हा उपक्रम सुरु केला. त्यांनी तो सर्व शाळांना लागू केला आहे का? की गोरगरिबांचे शिक्षण संपविण्याचा हा डाव आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. तसेच शिक्षण विभागामध्ये एकही अधिकारी सक्षम नाही, असे या उपक्रमातून दाखवून देण्यात येत आहे.
- दिलीप देवळेकर,
जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, रत्नागिरी.