रत्नागिरी : चिपळूणमध्ये शाळकरी विद्यार्थ्यासह तिघे बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:42 IST2017-08-28T23:42:07+5:302017-08-28T23:42:19+5:30
गणेश विसर्जनासाठी ओढ्याची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या अकरा तरूणांपैकी एका शाळकरी विद्यार्थ्यासह तिघेजण बुडल्याची घटना चिपळूण तालुक्यातील आबीटगाव येथे घडली.

रत्नागिरी : चिपळूणमध्ये शाळकरी विद्यार्थ्यासह तिघे बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले
रत्नागिरी, दि. 28 - गणेश विसर्जनासाठी ओढ्याची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या अकरा तरूणांपैकी एका शाळकरी विद्यार्थ्यासह तिघेजण बुडल्याची घटना चिपळूण तालुक्यातील आबीटगाव येथे घडली. शंतनू शांताराम दुर्गवले (१४) आणि रोहीत तुकाराम दुर्गवले (२३) अशा दोघांचा मृतदेह हाती आला असून, संकेत शांताराम धावडे (२३) याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन उद्या मंगळवारी होत आहे. विसर्जनासाठी आबीटगाव ते तुरंबव हा ओढा तसेच गणेश विसर्जन घाट साफ करण्यासाठी आबीटगाव येथील अकरा तरूण सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गेले होते. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे ओढ्याचे पाणी वाढले होते. अकरा तरूणांपैकी तिघेजण साफसफाईसाठी ओढ्याच्या पाण्यात उतरले आणि उरलेले आठ तरूण गणपती ठेवण्यासाठीची जागा साफ करत होते.
साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक पाण्याचा लोंढा वाढल्यामुळे ओढ्यात उतरून साफसफाई करणारे संकेत, शंतनू आणि रोहीत हे तिघेजण वाहून गेले. काठावर साफसफाई करणा-या तरूणांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी मदतीसाठी इतरांना बोलावले. मदतसाठी आलेल्या लोकांनी या तिघांचाही कसून शोध घेण्यास सुरूवात केली. त्यात शंतनू आणि रोहीतचा मृतदेह हाती लागला आहेत. मात्र संकेत धावडे बेपत्ताच झाला आहे. त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या घटनेची माहिती कळताच सावर्डे पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
गावावर शोककळा..
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ममुसळधार पावसातही बहुतांश ग्रामस्थ विसर्जन घाटावर दाखल झाले आहेत. पोलीस तसेच ग्रामस्थ तिसºया बेपत्ता तरूणाचा शोध घेत आहेत.