सव्वातीन महिन्यांतच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST2021-09-14T04:37:10+5:302021-09-14T04:37:10+5:30
रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. जून, जुलै हे दोन महिने पावसाचे मानले जातात. मात्र, हल्ली ...

सव्वातीन महिन्यांतच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली
रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. जून, जुलै हे दोन महिने पावसाचे मानले जातात. मात्र, हल्ली पाऊस लहरी झाला आहे. यंदा सातत्याने सुरू असलेल्या वादळांमुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला प्रारंभ झाला आहे. यंदा जुलै आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत सलग काही दिवस अतिवृष्टीमुळे चार महिन्यांची सरासरी सव्वातीन महिन्यातच पावसाने ओलांडली आहे.
२००५ सालापासून कोकणात अतिवृष्टी होत असून, दरड कोसळणे, रस्ते, भूभाग खचणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर घडू लागले आहेत. सध्या पावसाचे वेळापत्रक पूर्णत: बदलले आहे. कधी सरासरीपेक्षा अतिशय कमी तर कधी अतिवृष्टीचा कहर सुरू झाला आहे. २०१९ साली २ जुलै आणि २०२१ साली २२ जुलै या दिवशी रत्नागिरीसह महाराष्ट्रात अतिवृष्टीने महापूर आल्याने हाहाकार उडाला होता. या दोन्ही साली ऑगस्ट - सप्टेंबर या दोन्हीही महिन्यांमध्ये जोरदार पडलेल्या पावसाने चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी या शहरांबरोबरच तालुक्यांमधील अन्य भागात पाणी भरण्याच्या घटना घडल्या होत्या. घरांमध्ये, शेतीमध्येही पाणी घुसल्याने अतोनात नुकसान झाले होते.
रत्नागिरी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. या कालावधीत साधारणपणे ३३६४ मिलिमीटर पाऊस पडतो. जून महिन्यात साधारणपणे ८१८ मिलिमीटर पाऊस पडतो. जुलै महिन्यात त्यापेक्षा अधिक साधारणत: १२८६ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. तर ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर कमी होतो. या महिन्यात ८२९ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा जूनपासूनच पावसाची जोरदार फटकेबाजी सुरू झाली. जुलै महिन्यातही लक्षणीय पाऊस झाला. मात्र, ऑगस्टपर्यंत जेमतेम ३०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या निम्म्यापेक्षाही पाऊस कमी झाला आहे.
सप्टेंबर महिन्यात केवळ ४६० मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. मात्र, यंदाच्या सप्टेंबर महिन्यात ७ आणि ८ तारखेला झालेल्या अतिवृष्टीने या दोन दिवसांतच २६३.३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ८ सप्टेंबरलाच पावसाने ३३६४ मिलिमीटर ही वार्षिक सरासरीचा रेकाॅर्ड मोडत ३४२५ मिलिमीटरपर्यंत मजल मारली. अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरअखेर पावसाने ३५७० मिलिमीटरपर्यंत मजल मारली आहे.
सप्टेंबर पावसाचा महिना?
जून आणि जुलै हे दोन महिने पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. या महिन्यांत पाऊस अधिक पडतो. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाचा जोर कमी झाला होता. जुलै महिन्यात १६ जुलैपासून पावसाने मुसळधार पडण्यास सुरुवात केली. त्यामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ९११ मिलिमीटर इतका पाऊस झाला, तर जुलैअखेर १८१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे जेमतेम ३०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यात पुन्हा धडाकेबाज सुरुवात केल्याने या महिन्याच्या तेरा दिवसांतच ५३७.६४ मिलिमीटरची मजल मारली आहे. सप्टेंबर महिन्यात ४७० मिलीमीटर पाऊस पडणे अपेेक्षित असते. मात्र, आतापर्यंतच एवढा पाऊस झाला असून, हवामान खात्याने अजूनही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने सप्टेंबर महिना पावसाचा महिना ठरणार आहे.