आठवी इयत्तेवरील विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीबाबत जनजागृती
By Admin | Updated: January 4, 2016 00:41 IST2016-01-03T23:49:35+5:302016-01-04T00:41:16+5:30
पुस्तिकांचे वाटप : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रयत्न

आठवी इयत्तेवरील विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीबाबत जनजागृती
रत्नागिरी : वाहतुकीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने रत्नागिरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आठवी इयत्तेवरील विद्यार्थ्यांसाठी पुस्तिका काढून ती या विद्यार्थ्यांना वितरित करण्याचा मानस असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश दळवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सध्या वाहतुकीचे नियम माहीत नसणे, बेशिस्त वाहने हाकणे यामुळे अपघातांची संख्या वाढू लागली आहे. यामध्ये किशोरवयीन मुलांचा समावेश जास्त असतो. सध्या अल्पवयीन मुलांनाही पालक दुचाकी घेऊन देतात. धूमस्टाईलने वाहन दामटवणे ही सध्या क्रेझ झाल्याने यामुळेही अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकीस्वारांनी सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वापरणे गरजेचे असूनही किंवा चारचाकी चालकाने बेल्ट बांधणे आवश्यक असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अपघातावेळी जीवितहानी होण्याचे प्रकार वाढले आहेत. या दृष्टीने या मुलांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती होणे गरजेचे आहे.
यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश दळवी यांनी वाहतुकीच्या नियमांची माहितीपुस्तिका काढून ती जिल्ह््यातील आठवी ते पदवीधर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. यापूर्वी दळवी यांनी जळगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद लाभल्याने आता रत्नागिरीतही हा उपक्रम राबविण्याचा मानस दळवी यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
येत्या १० जानेवारीपासून रत्नागिरी विभागाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याचे औचित्य साधून ही पुस्तिका अधिकाधीक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये रस्ता वाहतूक सुरक्षेसंदर्भात जागृती झाल्यास बेशिस्त वाहने चालवणे तसेच वाहतुकीचे नियम मोडणे याबाबत जार्गती होईल. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास दळवी यांना आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये अशा पुस्तिका आठव्या इयत्तेवरील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हे कार्यालय प्रयत्न करणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश दळवी यांनी दिली. (प्रतिनिधी)