जीर्ण वीज वाहिन्या बदलाच्या कामाला गती
By Admin | Updated: January 7, 2015 23:57 IST2015-01-07T22:24:27+5:302015-01-07T23:57:52+5:30
चिपळूण शहर : दोन दिवस कामे सुरू राहणार

जीर्ण वीज वाहिन्या बदलाच्या कामाला गती
चिपळूण : पावसाळ्यात होणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे झाडे वीज वाहिन्यांवर पडून वीजखांब कोसळण्याच्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर जीर्ण वीज वाहिन्या बदलण्याची कामे महावितरणच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सुरु करण्यात आली आहेत. शहर परिसरात ही कामे दि. ८ व ९ जानेवारी दरम्यान होणार आहेत.
गेल्या वर्षी वादळी वाऱ्यामुळे गोवळकोटसह चिपळूण शहरात झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडून महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. याचा सर्वाधिक फटका गोवळकोट परिसराला बसला होता. वीज वाहिन्या व खांब बदलण्याचे काम महिनाभर सुरु होते. या अनुषंगाने महावितरण कंपनी, चिपळूणतर्फे यावर्षी महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जुन्या एलटी लाईनच्या वाहक तारा बदलण्याचे व विद्युत वाहिन्यांचे काम हाती घेतले आहे.
दि. ८ रोजी बुरुमतळी, भोगाळे, चिंचनाका, वडनाका, देसाई मोहल्ला, खेंड बाजारपेठ, भेंडीनाका, माप, पेठमाप, गोवळकोट रोड, तर दि. ९ रोजी जुना भैरी मंदिर, कन्याशाळा, बापट आळी, बेंदरकरआळी, पवारआळी, मुरादपूर, महाराष्ट्र हायस्कूल या भागातील वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. वीज देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनी, चिपळूण विभागातर्फे करण्यात आले आहे. चिपळूण परिसरात वादळी पावसाने, जोरदार वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या वाहिन्यांवर पडून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर महावितरणने गोवळकोट परिसरातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी दि. ८ व ९ रोजी देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. या साऱ्या कामकाजाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. (वार्ताहर)