प्रकल्प समर्थकांची शिवसेनेकडून गळचेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST2021-07-04T04:21:13+5:302021-07-04T04:21:13+5:30

या प्रकल्पाची जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर या भागातून प्रकल्पविरोधी भावना भडकविण्यात अग्रेसर असणाऱ्या स्वयंसेवी संघटनांनी काढता पाय घेतला. ...

Project supporters strangled by Shiv Sena | प्रकल्प समर्थकांची शिवसेनेकडून गळचेपी

प्रकल्प समर्थकांची शिवसेनेकडून गळचेपी

या प्रकल्पाची जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर या भागातून प्रकल्पविरोधी भावना भडकविण्यात अग्रेसर असणाऱ्या स्वयंसेवी संघटनांनी काढता पाय घेतला. प्रकल्प समर्थकांनी या संघटनांवर प्रश्नचिन्हे उभी करण्यास सुरुवात केल्याने अणुऊर्जा प्रकल्पापासून बस्तान मांडून बसलेले काही स्वयंघोषित समाजासुधारक कार्यकर्ते स्थानिकांची ढाल करुन प्रकल्पविरोधाचे विष पेरतच राहिले. नाणार येथे उभा राहणाऱ्या या रिफायनरी प्रकल्पाची जमीन अधिग्रहण अधिसूचना रद्द झाल्यानंतर येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आम्हाला प्रकल्प हवा, आम्ही रिफायनरी समर्थक म्हणत २० जुलै २०१९ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिफायनरी समर्थन मोर्चा काढला व आपल्या मागण्या मांडल्या.

एखाद्या प्रकल्पाच्या समर्थनासाठी निघालेला व प्रकल्पाची मागणी करणारा हा कोकणातील पहिलाच मोर्चा होता. मात्र, या मोर्चाच्या निमित्ताने नाणारमधील स्थानिक शेतकऱ्यांनी केलेली मागणी शासनापर्यंत आजपर्यंत पोहोचू शकलेली नाही किंबहुना सत्ताधाऱ्यांनी विशेषत: शिवसेनेने ती स्वत:पर्यंत पोहोचू दिली नाही, यासारखे कोकणवासीयांचे दुसरे दुर्दैव नाही, असेच म्हणावे लागेल. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या समर्थन मोर्चानंतर खऱ्या अर्थाने प्रकल्प समर्थनाच्या आंदोलनांना सुरुवात झाली. पण प्रकल्प विरोधासाठी खोलात पाय फसलेल्या शिवसेनेने या समर्थकांची सतत दलाल म्हणून हेटाळणी केली. नाणार होणार नाही, असे म्हणत अक्षरशः गळचेपी केली. प्रकल्प समर्थकांवर सातत्याने अन्याय करण्याचे काम करण्यात आले, त्यांच्या प्रकल्पाच्या मागणीकडे शिवसेनेने व इतर राजकीय पक्षांनी फक्त राजकीय स्वार्थापोटी दुर्लक्ष केले.

या प्रकल्पाला कधीही विरोध न केलेल्या भाजपने हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असतानाही या प्रकल्प समर्थकांच्या मागणीकडे बहुतांश दुर्लक्षच केले. प्रकल्पाची मागणी करणारे दलाल असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी करायला सुरुवात केल्यावर अखेर प्रकल्प समर्थक शेतकऱ्यांनी प्रकल्प परिसरात डोंगर तिठा येथे ०२ मार्च २०२० रोजी समर्थन सभा घेऊन आपण स्थानिक शेतकरीच असल्याचे दाखवून दिले व याचठिकाणी या नाणार परिसरातील सुमारे एक हजार पाचशे कुटुंबांनी आठ हजार पाचशे एकर जमिनीची संमत्तीपत्रे मीडियासमोर आणली. याचवेळी या परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या प्रकल्पविरोधी भूमिकेविरोधात उघडपणे आपले मत व्यक्त केले. मात्र, त्यानंतर या शिवसेनेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची हकालपट्टी करुन प्रकल्प समर्थकांची गळचेपी कायम सुरु ठेवली.

शिवसेनेने नाणार येथे प्रस्तावित असणाऱ्या प्रकल्पाविरोधातली आपली भूमिका कायम ठेवली व आजच्या घडीला इतर राजकीय पक्ष प्रकल्पाच्या समर्थनार्थ उभे राहत असताना व प्रकल्पाचे समर्थन वाढत असतानाही केवळ आपल्या हट्टापायी शिवसेनेने या प्रकल्पाचे घोंगडे अद्यापही भिजत ठेवले आहे. त्यामुळे ज्या कोकणी जनतेने शिवसेनेला आजपर्यंत भरभरून दिले ती शिवसेना कोकणवासीयांचे विकासाचे स्वप्न सत्यात उतरवणार की धुळीस मिळवणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. पण एक मात्र नक्की की आजपर्यंत येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणारी राजापूरची जनता आता रोजगारासाठी व विकासासाठी प्रकल्पाची मागणी करत आहे. त्यामुळे होय !... राजापूर (कोकण) बदलतयं ! असेच म्हणावे लागेल.

Web Title: Project supporters strangled by Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.