विद्यार्थ्यांसमोर समस्या जटील
By Admin | Updated: October 14, 2015 00:03 IST2015-10-13T21:02:31+5:302015-10-14T00:03:04+5:30
रात्रशाळा : मुलांच्या परीक्षा शुल्क माफीची मागणी

विद्यार्थ्यांसमोर समस्या जटील
वाटूळ : राज्यात २१० रात्रशाळा असून, त्यामध्ये सुमारे २१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पैकी मुंबईमध्ये सुमारे १३६ शाळा असून, त्यात १३ हजार विद्यार्थी शिकत आहेत. दिवसाच्या शाळेतील मुलांच्या समस्या वेगळ्या, तर रात्रीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या खूप जटील असतात.
रात्रशाळेत जाणाऱ्या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. शिक्षण नसल्याने दिवसभर श्रमाची कामे करून रात्रीच्या शाळेला जावे लागते. ती करून विद्यार्थी घरी न जाता परस्पर शाळेत जातात. दिवसभर काम करून थकल्यामुळे भूक लागते पण खाणार काय ? पगार कमी असल्याने घरच्या जबाबदारी पेलून खर्च कसा करायचा हा प्रश्न असतो. या परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण करतात. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे म्हणाले.
दिवसाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत पोषण आहारासोबत पाठ्यपुस्तके शासनाकडून पुरविण्यात येतात. रात्रशाळेतील विद्यार्थी मात्र या सुविधांपासून वंचित आहेत. सरकारने या विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार करून अशा सर्व इयत्तांमधील प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतच्या सर्व मुलांना दिवसाच्या शाळांप्रमाणे सर्व लाभ मिळण्यासाठी सुळे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले आहे. त्यांच्याकडे परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. राज्यातील ७ हजार विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. (वार्ताहर)