कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST2021-04-09T04:33:59+5:302021-04-09T04:33:59+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. दररोज १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तसेच एकाच दिवसात ४ कोरोनाबाधितांचा ...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. दररोज १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तसेच एकाच दिवसात ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोराेनाची दहशत वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
गणपतीपुळे : सागरी महामार्गावरील आरेवारेमार्गे गणपतीपुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांतून मार्गक्रमण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार मागणी करूनसुध्दा रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सागरी सुरक्षा प्रभावी होणार
रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या आयसीजीएस अग्रीम व आयसीजीएस-अचूक या दोन अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज व वेगाने मार्गक्रमण करू शकणाऱ्या बोटी आणल्या असून तटरक्षक दलाच्या ताफ्यात त्या दाखल झाल्या आहेत. जिल्ह्याची सागरी सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी बोटी आणण्यात आल्या आहेत. दापोली ते मांडवा सागरी सुरक्षा प्रभावी होणार आहे.
साथींचे आजार वाढले
चिपळूण : उष्मा वाढला असून पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सर्दी, पडसे, तापसरी, डोकेदुखी, उलटी, जुलाबाने लोक त्रस्त झाले आहेत. कोरोनामुळे रुग्णालयात जाणे टाळत असून, घरीच औषधोपचार करीत आहेत.
पर्यटनासाठी नवे धोरण
लांजा : पर्यटनाला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने कोकणातील पर्यटनासाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी केली आहे. यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच पर्यटनासंदर्भात कोकणासाठी खास संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे.
टँकरने पाण्याची विक्री तेजीत
रत्नागिरी : नगर परिषदेतर्फे शहरामध्ये सोमवार दि. ५ व मंगळवार दि. ६ एप्रिल रोजी पाणीपुरवठा होणार नसल्याचे घोषित केले होते. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणावरील पंपिंग यंत्रणा बसवून ती कार्यान्वित करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवला होता. त्यामुळे अनेक अपार्टमेंटधारकांनी टँकरने पाणी विकत मागविले.
माती परीक्षण थेट शिवारात
रत्नागिरी : मृदा पत्रिकेद्वारे मातीचे आरोग्य तपासून त्याप्रमाणे पीक परिस्थिती हाताळण्यासाठी कृषी विभागातर्फे थेट शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वत: शेतकरीच आपल्या जमिनीची सुपीकता ओळखून त्याप्रमाणे उत्पादन घेण्यासाठी प्रशिक्षित होणार आहेत.
नादुरुस्त रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी-मुचरी ते वाशी सहाणेपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. अन्यथा ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
हळद पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे हळद लागवड प्रशिक्षण देण्यात आले. प्रगतीशील शेतकरी सचिन कारेकर यांनी विकसित केलेल्या स्पेशल कोकण ४ या हळद पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.