दारिद्र्याला कंटाळून दाम्पत्याने बालकालाच विकले
By Admin | Updated: April 25, 2015 01:08 IST2015-04-25T01:07:40+5:302015-04-25T01:08:27+5:30
मळेवाड येथील घटना : पाच हजाराला गोव्यात विक्री; पोलिसांकडून चौकशी, तक्रार नाही

दारिद्र्याला कंटाळून दाम्पत्याने बालकालाच विकले
सुभाष परूळेकर / मळेवाड
पदरी अठराविश्व दारिद्र्य, कुणाकडे तरी मोलमजुरी करायची आणि दोन वेळची पोटाची खळगी भरायची; पण आपणालाच मिळत नाही, तेथे मुलाला कोठून घालायचे, अशा विवंचनेत असलेल्या मळेवाड - जांभळीचे भरड येथे भाड्याने राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या चार महिन्यांच्या बालकालाच चक्क गोव्यात विकले. पहिल्यांदा मूल चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या या दाम्पत्याला ग्रामस्थांनी हिसका दाखवताच, होय, मी मुलाला पाच हजार रुपयांना विकल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती. आरोंदा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी झापू पवार यांनी या दाम्पत्याची चौकशी केली.
मूळचे बांदा-देऊळवाडी येथील खेमराज व गीता सावंत हे दाम्पत्य काही महिन्यांपूर्वीच मळेवाड सीमेवरील जांभळीचे भरड येथे राहण्यासाठी आले. तेथीलच एका ग्रामस्थाच्या पडवीत त्यांनी संसार थाटला. सकाळी कुणाच्या तरी कामावर जायचे आणि संध्याकाळी यायचे. कोणी पैसे दिले तर जेवण, अन्यथा रात्र तशीच काढायची, असा त्यांचा दिनक्रम होता. या दाम्पत्याने २२ डिसेंबर २०१४ रोजी अपत्याला जन्म दिला होता. चार महिने हे अपत्य त्यांच्यासोबत आहे. (पान ९ वर)