मनोज मुळ्येरत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुका संपल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली आहे. सध्या संघटनात्मक स्तरावर शिवसेना आणि भाजपकडूनच हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलांमुळे शिवसेनेत आणि विरोधी पक्ष असल्याने भाजपमध्ये थोड्याफार घडामोडी घडत आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघातच विकास कामांच्या कार्यक्रमानिमित्ताने आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी थोडी चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे कमालीची शांतता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मुळातच राजकीय कुरघोडींबाबत शांत आहे. केवळ निवडणुका आल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये काहीतरी हालचाली सुरू होतात. त्याखेरीज इतर काळात राजकीय पक्षांमध्ये सारे काही शांत शांतच असते. जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका आणि त्यापाठोपाठ फेब्रुवारीमध्ये सरपंच निवडणुका होताना राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ सुरू होती. त्यातही शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तीनच पक्षांत अधिक हालचाली होत्या.आता त्या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय स्तरावरील हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय स्तरावर शांतता आहे.शिवसेनाजिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या निमित्ताने शिवसेनेत काही ना काही हालचाल होत आहे. पदासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. त्यातही अध्यक्ष पदासाठी अनेक दावेदार असल्याने कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. बराच काळ मागे पडलेले उदय बने आता पुढे आले आहेत. खेड आणि रत्नागिरीत चढाओढ लागली आहे. सध्या तरी हे शीतयुद्ध आहे; पण त्यामुळे संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि सभापती निवडीत आमदारही उत्सुक असले तरी वरिष्ठांकडून अजून कोणतेही संकेत नाहीत.भाजपविरोधी पक्षाच्या भूमिकेत असल्याने भाजपने शिवसेनेवर सतत वार करणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे भाजपमध्येही हालचाली होत आहेत. कामगार आघाडी असेल किंवा माजी खासदार नीलेश राणे यांची आक्रमक भूमिका असेल, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भाजपही आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले नसले तरी शिवसेनेला निर्भेळ आनंद मिळू नये, इतके यश भाजपने मिळवले. त्यातूनही भाजपमधील उत्साह वाढला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसपक्षीयदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचालीही मंदावलेल्याच आहेत. उदय सामंत आणि भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर पक्षाची ताकद खूपच कमी झाली आहे. या दोघांकडे एकतर पद होते आणि त्यात या दोघांचाही कार्यकर्त्यांमधील वैयक्तिक संपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते नेले आहेत. केवळ शेखर निकम हे एकटेच राष्ट्रवादीकडून किल्ला लढवत आहेत. विकास कामांच्या माध्यमातून ते सतत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात फिरत असतात. हीच राष्ट्रवादीची भक्कम बाजू आहे.जिल्हाध्यक्ष हटाव मोहिमेखेरीज काँग्रेसमध्ये शांतताचमाजी खासदार हुसेन दलवाई यांचा अधेमधे होणारा दौरा आणि यात त्यांनी भाजपवर केलेली टीका वगळता काँग्रेसमध्येही पक्षीय पातळीवर पूर्ण शांतता आहे. जिल्हाध्यक्ष हटाव हा काँग्रेसचा पारंपरिक नारा अधूनमधून पुढे येतो. हा नारा राष्ट्रवादी स्वतंत्र होण्याआधीपासूनचा कायम आहे. तो केवळ काँग्रेसमध्येच मोठ्या प्रमाणात टिकून राहिला आहे. संघटनात्मक वाढ असेल किंवा कामांच्या माध्यमातून लोकांसमोर जाण्याबाबत काँग्रेसचे प्रगतीपुस्तक अजून कोरेच आहे. सत्तेत असलेला काँग्रेसचा सहभाग जिल्ह्यात कोठेच दिसत नाही. सत्ता नसतानाही हुस्नबानू खलिफे यांनी केलेले प्रयत्न आता सत्ता असतानाही इतरांकडून होत नाहीत.
रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण फिरतंय शिवसेना, भाजपभोवतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 11:18 IST
Politics Shiv Sena BJP Ratnagiri ग्रामपंचायत निवडणुका संपल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली आहे. सध्या संघटनात्मक स्तरावर शिवसेना आणि भाजपकडूनच हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलांमुळे शिवसेनेत आणि विरोधी पक्ष असल्याने भाजपमध्ये थोड्याफार घडामोडी घडत आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघातच विकास कामांच्या कार्यक्रमानिमित्ताने आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी थोडी चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे कमालीची शांतता आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण फिरतंय शिवसेना, भाजपभोवतीच
ठळक मुद्देराष्ट्रवादी चिपळूण, संगमेश्वरात कार्यरत काँग्रेस नेहमीप्रमाणे शांतच