एसटीला पंढरीची ओढ, सलग दुसऱ्या वर्षी १२ लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:06+5:302021-07-20T04:22:06+5:30
मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात शेतीची कामे सुरू असल्याने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोजकीच ...

एसटीला पंढरीची ओढ, सलग दुसऱ्या वर्षी १२ लाखांचा फटका
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात शेतीची कामे सुरू असल्याने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे या वारीला रत्नागिरी विभागातून जादा गाड्या सुटत नसल्या, तरी पुणे विभागाच्या मदतीसाठी दरवर्षी ५० गाड्या पाठविल्या जातात, परंतु कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणे या वर्षीही वारी होणार नसल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी गाड्या पाठविण्यात आलेल्या नाहीत. महामंडळाला जादा गाड्यांमुळे मिळणारे उत्पन्न मात्र थांबले आहे.
अन्य जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. पुणे विभागाच्या मागणीनुसार दरवर्षी पन्नास गाड्या रत्नागिरी विभागातून पाठविल्या जातात. सलग आठवडाभर गाड्या पंढरपूर मार्गावर धावत असल्याने मिळणारे उत्पन्न महामंडळाच्या खात्यात जमा होते.
कार्तिकीला जादा गाड्या
कार्तिकी एकादशीला जिल्ह्यातून भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात. त्यामुळे रत्नागिरी विभागातून १२५ ते १५० जादा गाड्या सोडण्यात येतात, शिवाय काही भाविक दिंडी किंवा वारी घेऊन पायी पंढरपूरला जातात. मात्र, येताना एसटीने गावी परततात. त्यामुळे कार्तिकी एकादशीला जादा गाड्यांच्या वाहतुकीमुळे उत्पन्न प्राप्त होते. मात्र, तेही थांबले आहे.
वारीअभावी उत्पन्नावर परिणाम
गेले दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी एकादशीची वारी बंद असल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. सलग आठवडाभर जादा गाड्यांमुळे १२ लाखांचे प्राप्त होणारे उत्पन्न थांबले आहे.
गतवर्षी दिवाळीत मंदिरे खुली करण्यात आली. मात्र, गर्दी टाळण्यासाठी यात्रेला बंदी होती. कार्तिकी एकादशीसाठी विभागातून सुटणाऱ्या जादा गाड्या गतवर्षी न गेल्याने उत्पन्नावर परिणाम झाला.
कोरोनामुळे गतवर्षी आषाढी एकादशीची वारी झाली नव्हती. या वर्षीही वारीसाठी परवानगी नाही. दरवर्षी न चुकता दर्शनासाठी पंढरपूरला जातो, परंतु सलग दोन वर्षे वारी नसल्याने दर्शनाची खंत तर आहे, शिवाय वारी काळातील वातावरण व अनुभूती याची प्रखर आठवण होते.
- श्यामल पाटील, रत्नागिरी
आषाढी एकादशीला जिल्ह्यातून जाणारे भाविक मोजकेच असल्याने जादा गाड्या साेडल्या जात नाहीत, परंतु कार्तिकी एकादशीला जादा गाड्या सोडतो.
आषाढीला पुणे विभागासाठी पाठविल्या जाणाऱ्या बसेस दोन वर्षे बंद असल्याने उत्पन्न घटले आहे.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक