केवळ लोकांनीच नियम पाळायचे का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:34+5:302021-07-01T04:22:34+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने रुग्ण वाढतच चालले आहेत. दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहता सोशल डिस्टन्सिंगचे नियम, ...

केवळ लोकांनीच नियम पाळायचे का
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने रुग्ण वाढतच चालले आहेत. दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहता सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मास्कचा अनिवार्य वापर आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबत कोविड-१९ च्या नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र, लोकांना कोरोना नियमांचे धडे देणारे राजकारणी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोरोनाच्या नियमांची किती अंमलबजावणी केली जाते, याकडे पाहिल्यास कोणीही सांगू शकतो त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या नियमांचे आधी राजकारणी, लोकप्रतिनिधींनी स्वत: पालन करावे, त्यानंतर लोकांना त्याबाबतचे मार्गदर्शन, धडे द्यावेत. कोरोनाच्या संकटात केवळ लोकांनीच नियम पाळायचे का, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे नियम बनविणाऱ्यांनी ते तोडण्यापेक्षा त्यांचे पालन आधी स्वत: करावे, त्यानंतरच लोकांकडून अपेक्षा करावी.
दरम्यान, जेथे गर्दी तेथे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती जास्त असून, ही बाब काळजी करण्यासारखी आहे. त्यामुळे कोरोना कालावधीत गर्दी होऊ नये, तसेच संसर्ग पसरू नये, यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते आणि आजही नियम शिथिल करण्यात आले असले तरी त्यांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे, असेच प्रत्येकाने समजण्याची आवश्यकता आहे. आजची परिस्थिती पाहता कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. लाॅकडाऊन केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी होण्यापेक्षा रुग्ण वाढल्याचे शासकीय अहवालानुसार स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही अधिक असल्याने अनेक जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये प्रत्येकाने आपल्या तसेच आपल्या कुटुंबीयांच्या जिवाची पर्वा करूनच कोरोनापासून स्वत:ला कसे वाचवता येईल, यावर भर दिला पाहिजे. काही लोकांचे अजूनही डोळे उघडलेले नाही. दररोज माणसं मरत असतानाही अनेक जणांचा समज-गैरसमज असा आहे की, कोरोना कोठेही नाही. हे लोकसंख्या कमी करण्यासाठीचे नाटक आहे असे समजून बिनधास्तपणे वागताना दिसतात.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत हजारो लोकांना जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर लहान बालकांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर कोरोनाच्या संसर्गापासून तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला समर्थपणे तोंड देण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणाही दिवस-रात्र झटत आहे. ही बाब आता नवीन राहिलेली नसली तरी लोकांनी आरोग्य यंत्रणा, प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. मात्र, लोकांकडून सहकार्याची अपेक्षा करताना राजकारणी, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपण सोशल डिस्टन्सिंग तसेच गर्दी करत असल्यास याकडे लोक लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे लोकांना सोशल डिस्टन्सिंग, माक्स तसेच सॅनिटायझरचे महत्त्व सांगण्यापेक्षा त्याचे आपण किती पालन करतो आहोत, याचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकारणी, लोकप्रतिनधींच्या बैठका, सभा, उद्घाटने यासाठी होणारी गर्दी कमी करावी. जेणेकरून लोकही कोरोनाच्या नियमांचे पालन करतील.
सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी कोरोना संसर्ग वाढलेला असतानाही मोर्चे, बैठका, कार्यक्रम घेऊन प्रसिद्धीच्या झोतात वावरताना दिसतात. हे सर्व करताना त्यांच्याकडून कोविड-१९ च्या नियमांचे पालन होते का, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नसल्याने लोकांकडून नियम पाळण्याची अपेक्षा कशी करता, असेच म्हणावे लागेल.