समिती त्रयस्थ राहिली तरच मोहीमेला भविष्य
By Admin | Updated: August 23, 2015 23:33 IST2015-08-23T23:33:14+5:302015-08-23T23:33:35+5:30
तंटामुक्त मोहीम : मंडलनिहाय तंटे सोडवणे आवश्यक

समिती त्रयस्थ राहिली तरच मोहीमेला भविष्य
सुभाष कदम ल्ल चिपळूण
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीतील राजकीय हस्तक्षेप कमी झाला. गावगुंडी कारभारावर टाच आली. पोलीसपाटील, पोलीस कर्मचारी, तलाठी व इतर अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम केले व त्रयस्थपणे निर्णय घेतले तरच भविष्यात ही मोहीम टिकणार आहे. अन्यथा शासनाला ही मोहीम गुंडाळावी लागेल.
महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम यशस्वी होण्यासाठी समितीची रचना व निर्मिती करतानाच काटेकोरपणे पावले उचलायला हवीत.
ग्रामसभेत ज्याला अध्यक्ष केले जाते, त्याचा पूर्वेतिहास व पार्श्वभूमी तपासायला हवी. अनेकवेळा गावात धाकदपटशहा करणारा किंवा मनमानी करणारा तर काही वेळा गावाने ओवाळून टाकलेला सदस्यही अध्यक्ष होतो. या मंडळीला पार्श्वभूमीच नसल्याने अध्यक्षपदाच्या नावाखाली त्यांचे इतर गोष्टींकडेच अधिक लक्ष असते. त्यामुळे ते न्याय काय देणार? हाही प्रश्न आहे. अनेकवेळा गावातील चौकट आपला मर्जीतील अध्यक्ष लादते. त्याने काहीही केले नाही तरी वर्षानुवर्षे त्याच व्यक्तीला पुन्हा पुन्हा संधी दिली जाते.
गावातील हुशार किंवा प्रतिष्ठित असणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीला समितीपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे समितीच्या रचनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. काही गावात तर मतदानाचा हक्क नसणारी व्यक्तीही अध्यक्ष झालेली आहे. ही स्थिती बदलणे गरजेचे आहे. शासन निर्णयाप्रमाणे समितीची रचना काटेकोरपणे करायला हवी.
अनेक गावात ग्रामसभेला येण्याबाबत ग्रामस्थांची उदासीनता असते. त्यामुळे जे १० ते १२ ग्रामस्थ उपस्थित असतात तेच आपल्या मर्जीनुसार समितीची रचना करतात. त्यामुळे योग्य लोकांना संधी मिळत नाही. त्यासाठी सर्वांनी ग्रामसभेला उपस्थित राहून आपले अधिकार समजून घ्यायला हवेत. अनेकवेळा तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांना आपले नक्की अधिकार काय, याचेही आकलन नसते. तसे त्यांना कोणी मार्गदर्शन किंवा प्रशिक्षितही करत नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या कामाबद्दल माहिती नसते. समितीच्या सभाही फार कमी होतात. एखाद्याने तक्रार अर्ज दिला तर गावकीच्या बैठकीप्रमाणे त्याचा कीस काढला जातो. त्यातून योग्य निर्णय होतच नाही. त्यामुळे तक्रारदारही नाराज होतो.
तंटामुक्त समितीच्या बैठकीला पोलीस कर्मचारी, तलाठी, महसूलचे अधिकारी अनेकवेळा अनुपस्थित राहतात. त्यामुळे समितीच्या सदस्यांना योग्य तांत्रिक माहिती मिळत नाही. अनेकवेळा महसूली प्रश्नांबाबत गुंते वाढत जातात.
महसूली तंट्यांमुळे जिल्ह्यातील अनेक गावे अद्याप तंटामुक्त झालेली नाहीत. त्यामुळे तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन मंडलनिहाय तंटे सोडविले तर या तंट्यांवर नियंत्रण येईल व गावे तंटामुक्त होतील.