कांद्याने मारले...तरी भाज्यांनी तारले
By Admin | Updated: August 23, 2015 00:41 IST2015-08-23T00:39:18+5:302015-08-23T00:41:03+5:30
बजेट कोलमडलेले : भाज्या स्वस्त झाल्यामुळे महिला सुखावल्या

कांद्याने मारले...तरी भाज्यांनी तारले
रत्नागिरी : कांद्याच्या दराने उचल खाल्ली आहे. त्यामुळे गृहिणींना बजेट जुळविणे अवघड बनले आहे. मात्र त्याचवेळी भाज्यांचे दर खालावले असल्याने महिलावर्ग सुखावला आहे. रत्नागिरीतील नियमित बाजाराबरोबरच आठवडा बाजारातही कांदा ७० रूपये किलो दराने विकला जात आहे.
कांद्याप्रमाणे लसणीचे दरही वधारले आहेत. १२० ते १६० रूपये किलो दराने लसूण विकण्यात येत आहे. अर्थात बटाटा मात्र २० रूपये किलो दरावर स्थिर आहे. पावसामुळे कांद्याचे पीक वाया गेल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच दरात मोठी वाढ झाली आहे.
कांदा वधारला असला तरी भाज्यांचे दर मात्र खालावले आहेत. भाज्यांची आवकही वाढली आहे. बाजारात मटार मुबलक स्वरूपात विक्रीस उपलब्ध आहे. श्रावणामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. गावठी भाज्याही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.
गावठी भेंडी, दोडकी, पडवळ, भोपळा, काकडीदेखील बाजारात येऊ लागले आहे. भेंडी १० रूपयाला तीन जुड्या तर पडवळ दोडकी १० ते १५ रूपये प्रति नग दराने विकण्यात येत आहेत. याशिवाय काकडी २० रूपये किलो असली तरी मोठ्या काकड्या २० ते ४० रूपये प्रति नग विकण्यात येत आहेत.
चिबूड ४० ते ६० रूपये दराने विकण्यात येत आहे. कापलेल्या भोपळ्याच्या शेडीची १० रूपये दराने विक्री सुरू आहे. मका १० ते १५ रूपये प्रति नग तर ओल्या भुईमुगाच्या शेंगा ४० ते ५० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत.
कोथींबीर जुडी १० ते १५, मेथी, पालक, मुळा, शेपू, माठ, कांदापात, चवळी, मोहरी, आंबाडीची जुडी ७ ते १० रूपये दराने विकण्यात येत आहेत. श्रावण असल्याने अळुवडीची, हळदीची पानेही विक्रीस उपलब्ध आहेत.
बाजारात फळांची आवकही वाढली आहे. सिमला सफरचंद, छोट्या आकारातील सफरचंद मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. ओला खजूर पॅकींग ७० ते ९० रूपये, केळी ४० ते ६० रूपये डझन, दराने विकण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)