रत्नागिरी : नळपाणी पुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीसारखा कोणताही आर्थिक भार जनतेवर न लादता ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.पंचायत समितीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या श्यामराव पेजे सभागृहात आयोजित पाणी गुणवत्ता कार्यक्रम तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पंचायत समिती सभापती अनुष्का खेडेकर, प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे, गटविकास अधिकारी जे. डी. साखरे, उपसभापती योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये आदी उपस्थित होते. रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्रातील आठ गावांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बावनदीतील पाणी आणण्यासाठी शासनाने नुकतीच ५७ कोटी रुपयांच्या निधीला त्वरित मान्यता दिली आहे. त्यामुळे जनहिताची विकासकामे करत असताना जात, पात, धर्म, पक्ष विसरुन ग्रामस्थांनी एकत्रित विकासाच्या प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. जनहिताची कामे करत असताना निकोप स्पर्धेच्या माध्यमातून दर्जेदार कामाचा आग्रह समाजातील प्रत्येक घटकाचा असला पाहिजे. दर्जेदार कामांसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी योग्य समन्वयाद्वारे कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच जनहिताचे निर्णय घेऊन दर्जेदार विकासाची कामे करणाऱ्या अधिकारीवर्गालाही प्रोत्साहन दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यशाळेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, अन्य विभागाचे अधिकारी व तज्ज्ञ यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद पाणी पुरवठा व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कार्यशाळेत भाग घेतला. (शहर वार्ताहर)
पाणीपुरवठा योजनांसाठी आता लोकवर्गणीची अट रद्द
By admin | Updated: July 29, 2014 23:03 IST