राजापूर, दापोलीत ग्रामस्थांना नोटीस
By Admin | Updated: July 1, 2016 23:41 IST2016-07-01T22:43:50+5:302016-07-01T23:41:11+5:30
डोंगर खचण्याचा धोका : धोपेश्वरातील २३; तर दापोलीतील ८९८ कुटुंबांना धोका

राजापूर, दापोलीत ग्रामस्थांना नोटीस
राजापूर : पावसाळी दिवसात लगतचे डोंगर खचून घरावर पडण्याचा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धोपेश्वरातील गुरववाडी व खंडेवाडीतील सुमारे २३ ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याची नोटीस राजापूरच्या तहसीलदारांनी दिली आहे. यामुळे या भागातील स्थलांतरीत होण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे.
पावसाळी दिवसात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भूस्खलनाचा धोका असलेल्या भागांपैकी धोपेश्वर गुरववाडी व खंडेवाडी परिसराला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धोकादायक डोंगर लक्षात घेता ते खालील घरांवर केव्हाही कोसळू शकतात. याबाबत स्वत: तहसीलदारांसह सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, राजापूर यांच्याकडील तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली होती. त्यावेळी ही सर्व घरे दरडीला लागून असल्याचे निदर्शनास आल्याने या दोन वाड्यांतील घरांना स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या. सुरक्षित जागा कोणती ते मात्र तालुका प्रशासनाने सांगितले नाही. त्यामुळे दरडग्रस्त कुटुंबियांपुढील समस्या आणखीनच वाढली आहे.
आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षेची संभाव्य ठिकाणे म्हणून शासनाने यापूर्वी त्या परिसरातील शाळा, ग्रामपंचायत कार्यालये व अन्य ठिकाणे निश्चित केलेली असायची. पण, समस्त धोपेश्वरवासीयांना अशी कुठलीच सुरक्षित जागा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या कुटुंबियांनी जायचे कुठे? असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.
राजापूर तालुक्यातील वडदहसोळ गावातील हळदीची फांदी, गोपाळवाडी व अन्य ठिकाणीही धोक्याची परिस्थिती आहे. तेथील जनतेलाही स्थलांतरीत होण्याच्या नोटीस राजापूर तहसीलदारांच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र, या ग्रामस्थांनी अद्याप त्याठिकाणाहून स्थलांतर केलेले नाही. (प्रतिनिधी)
दरडग्रस्त ग्रामस्थांना सूचना : दापोलीतील ग्रामस्थांसाठी सुरक्षित ठिकाणची निश्चिती
या प्रश्नी समस्त धोपेश्वरवासीयांनी आमदार राजन साळवी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफियत मांडताच आमदार साळवींनी तत्काळ राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याशी संपर्क साधला व माहिती घेतली. प्रथम त्या कुटुंबीयांची व्यवस्था करा, अशी त्यांनी सूचना केली. त्याचवेळी समस्त दरडग्रस्त ग्रामस्थांनाही काळजी घ्या, अशीही सूचना केली. यावेळी रत्नागिरी शिवसेना रिक्षासेनेचे उपाध्यक्ष सुभाष गुरव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
समुद्रकिनारी नोटीस नाही
संभाव्य धोका असलेल्या गावांमध्ये मुरूड येथील १२५ कुटुंब समुद्रकिनारी वास्तव्यास असली तरी दरड कोसळण्याचा धोका नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. बुरोंडी येथील २५५ कुटुंबांना धोका नसल्याने त्यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली नाही. पावसाची संततधार सुरू राहिल्यास कुटुंबांनी तातडीने जी सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन केले आहे.