‘माविम’मुळे नऊ हजार महिला ‘घर’ मालकीण

By Admin | Updated: November 19, 2015 00:43 IST2015-11-18T23:42:13+5:302015-11-19T00:43:37+5:30

रत्नागिरी जिल्हा : ग्रामसभेच्या मान्यतेनंतर निर्णय

Nine thousand women 'house' ownership due to 'Mawim' | ‘माविम’मुळे नऊ हजार महिला ‘घर’ मालकीण

‘माविम’मुळे नऊ हजार महिला ‘घर’ मालकीण

रत्नागिरी : महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटाच्या चळवळीने नेत्रदीपक प्रगती केली आहे. महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होऊ लागल्याने जिल्ह्यातील ९२४४ महिलांचे नाव घराच्या कागदोपत्री लागण्याच्या प्रस्तावांना संबंधित ग्रामसभेने मान्यता दिली आहे. त्यापैकी तब्बल २४४४ महिला प्रत्यक्षात ‘घर मालकीण’ बनल्या आहेत.
महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात ‘माविम’मुळे ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांचे कष्ट कमी झाले. आज निरक्षर महिलाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीबरोबरच इतरही पूरक व्यवसाय करून पतीबरोबरच अर्थार्जन करू लागली आहे. आज तिची घरातील पत वाढली आहे.
एवढेच नव्हे; तर गावच्या विकासातही तिचा सहभाग वाढला आहे. झेंडावंदनाला महिला आवर्जुन उपस्थित राहू लागल्या असून, ग्रामसभांमध्येही भाग घ्यायला लागल्या आहेत. त्यांच्यात धाडस आणि आत्मविश्वास आला आहे.
माविमचे महिलांच्या विकासाचे कार्य चार टप्प्यात चालते. त्यातील एक टप्पा म्हणजे महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समानता. याचाच एक भाग म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री - पुरूष समानता यावी, घराची मालकी पतीप्रमाणेच पत्नीकडेही यावी, या उद्देशाने शासनाने ‘घर दोघांचे’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेऊन तसा अध्यादेशही काही वर्षांपूवी काढला आहे.
या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटाने ‘घर दोघांचे’ ही संकल्पना ग्रामीण भागात चांगलीच रूजवली आहे. अर्थार्जनात पत्नीचा समान वाटा आहे, तर मग तिला घराच्या मालकीत तो का मिळू नये, ही विचारधारा ग्रामीण भागात रूजवण्यात माविमचे जिल्हा समन्वयक दीपक भागवत आणि जिल्ह्यातील त्यांच्या संयोगिनींचा महत्त्वाचा वाटा आहे.
ग्रामीण भागात माविमने केलेल्या समाजप्रबोधनामुळे पुरूषवर्गाची मानसिकता बदलली आहे. त्यामुळे पती आपल्या बरोबरच पत्नीचे नाव लावण्यासाठी तयारी दर्शवू लागले आहेत.
पुरूषवर्गाने माविमच्या ‘घर दोघांचे’ या चळवळीला सकारात्मक दर्शवलेल्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील ९२४४ महिलांची नावे पतीबरोबरच लागण्यासाठीच्या प्रस्तावांना ग्रामसभेत मान्यता मिळाली असून, त्यापैकी २४४४ महिलांची नावे पतीसह सातबारा तसेच घरपट्टीवर आली आहेत. त्यामुळे घराचे मालक असलेल्या पतीराजांबरोबरच आता पत्नीही ‘घर मालकीण’ बनू लागल्या आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल खूप मोठे असल्याचे मानले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nine thousand women 'house' ownership due to 'Mawim'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.