दमडीचाही खर्र्च नाही
By Admin | Updated: January 13, 2015 00:08 IST2015-01-12T23:34:08+5:302015-01-13T00:08:22+5:30
मग्रारोहयो : शेततळ्यांच्या कामाबाबत प्रशासकीय उदासीनता

दमडीचाही खर्र्च नाही
रहिम दलाल - रत्नागिरी -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतंर्गत जिल्ह्यात २४७ शेततळी बांधण्यासाठी ३ कोटी ४२ लाख ९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती़ शेततळ्यांच्या कामाकडे लक्ष दिल्यास ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात भासणारी पाणीटंचाई दूर होण्यास मोठा आधार मिळू शकतो़ मात्र, चालू आर्थिक वर्ष संपत आले तरी जिल्ह्यात शेततळ्याचे एकही काम करण्यात आले नसल्याचे म्हटले जात आहे.
इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात कितीतरी पटीने पाऊस पडतो़ पावसाचे पाणी साठवण्याची कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने ते पाणी जमिनीवाटे नद्या, नाले, समुद्राला जाऊन मिळते़ पावसाचे पाणी साठवण्याच्या विविध उपाययोजना करता येऊ शकतात़ त्याबाबत सर्वच स्तरावर उदासीनता असल्याने शेततळ्यांच्या कामांकडे गांभिर्याने पाहिले जात नाही़ प्रशासकीय पातळीवरच शेततळ्यांच्या कामाबाबत उदासिनता असल्याचे दिसून येत आहे.
या योजनेअंतर्गत जलसंधारण व जलसंवर्धन कामे मातीचे बांध, दगडी बांध, वनराई बंधारे, सामूहिक शेततळे, साठवण तलाव, भूमिगत बंधारे आदी कामे वृक्ष लागवड व शेतीसाठी घेण्यात येतात़
बारमाही शेती करण्याच्या दृष्टीने शेततळ्यांचा वापर करता येऊ शकतो़ त्यासाठी या योजनेच्या माध्यमातून ही कामे हाती घेण्यासाठी जिल्ह्यात २४७ शेततळीची कामे घेण्यात येणार होती़ त्यासाठी सन २०१४-१५ च्या आराखड्यामध्ये जिल्ह्यात २४७ कामांसाठी ३ कोटी ४२ लाख ९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़सर्वाधिक तळींची कामे खेड तालुक्यामध्ये ६७ एवढी करण्यात येणार होती.
दरवर्षीप्रमाणे सन २०१४-१५ च्या मग्रारोहयोच्या आराखड्यामध्ये कोटीची उड्डाणे असली तरी सुमारे ४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, त्यामध्ये शेततळीच्या कामांवर दमडीही खर्च झालेली नाही. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाचा मग्रारोहयोचा आराखडाही कागदावरच राहणार असल्याचे चित्र आजच्या घडीला दिसून येत आहे.
तालुकातळ्यांची कामे
मंडणगड०१
दापोली२१
खेड६७
चिपळूण६८
गुहागर१२
संगमेश्वर१६
रत्नागिरी००
लांजा२०
राजापूर४२
एकूण२४७