नगराध्यक्षपद कळीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2015 22:49 IST2015-08-13T22:49:16+5:302015-08-13T22:49:16+5:30
रत्नागिरी : २०१६च्या पालिका निवडणुकीत युती तुटणार!

नगराध्यक्षपद कळीचा मुद्दा
प्रकाश वराडकर - रत्नागिरी नगरपरिषदेत चार वर्षांपूर्वी सेना - भाजप युतीची सत्ता आली. मात्र, शिवसेनेचे सर्वाधिक १३ नगरसेवक असूनही सेनेला केवळ सव्वा वर्ष नगराध्यक्षपद मिळाले. त्यानंतर नगराध्यक्षपद भाजपकडेच आहे. विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी नगराध्यक्षपद सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. नगराध्यक्षपद सोडले नाही तर पुढील निवडणुकीत युती नाही, अशी रोखठोक भूमिका सेनेकडून घेतली जात असल्यामुळे २०१६मधील पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर सेना-भाजपची युती होण्यात नगराध्यक्षपद हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
रत्नागिरी पालिकेत चार वर्षांपूर्वी शिवसेना - भाजप युतीची सत्ता आली. शिवसेनेचे १३, तर भाजपचे ८ नगरसेवक निवडून आले. युतीचे २८ पैकी २१ उमेदवार विजयी झाले. हाती आलेली सत्ता वाटून घेण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. त्यानुसार प्रत्येकी सव्वा वर्षाचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाचा कालावधी दोन वेळा घेण्याचा निर्णय झाला. प्रथम अधिक संख्याबळ असलेल्या शिवसेनेला नगराध्यक्षपदाची प्रथम संधी मिलिंद कीर यांच्या रुपाने मिळाली. त्यानंतर भाजपने पुढील दोनवेळा सव्वा वर्षाचा काळ नगराध्यक्षपद सांभाळले आहे. आता शेवटच्या सव्वा वर्षातही भाजप नगराध्यक्षपद सोडण्यास तयार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षात तिढा निर्माण झाला आहे.
सेनेच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत हा विषय पोहोचला असून, त्यांनीही भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांना कल्पना दिली आहे. भाजपने पक्षपातळीवर निर्णय घेऊन शेवटचे सव्वा वर्ष सेनेला नगराध्यक्षपद दिले, तरच २०१६ मधील निवडणुकीत स्थानिक पातळीवर सेना-भाजप युती होऊ शकते, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. सेनेचे खासदार विनायक राऊत, जिल्ह्यातील सेनेचे नेते राजेंद्र महाडिक, भाजप नेते बाळ माने, जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर व अन्य भाजप नेत्यांची या नगराध्यक्ष समस्येबाबत चर्चा होऊनही काही काळ उलटला आहे. नेत्यांमधील समेटाची चर्चा निष्फळ ठरल्याची चर्चाही आता जोरात आहे.
पक्षनेत्यांची शिष्टाईही असफल
राष्ट्रवादीला होणार लाभ
नगराध्यक्षपदाच्या कळीच्या मुद्द्यावरून सेना - भाजपात निर्माण झालेला वादंग मिटला नाही, तर दोन्ही पक्षांना २०१६मधील नगरपरिषद निवडणुकीत राजकीय तोटा होण्याची शक्यता अधिक आहे. चार वर्षांपूर्वी युतीचे २१ सदस्य हे एकमेकांच्या राजकीय बळावरच निवडून आल्याचे दोन्ही पक्ष मान्य करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आखाड्यात आमने - सामने आल्यास दोघांचेही नुकसान होऊन त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा फायदा होण्याची शक्यता आहे.
भाजप असुरक्षित
शिवसेनेचा विरोध असूनही विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्याविरोधात अविश्वास दाखल करण्याइतके संख्याबळ होत नाही. चार सदस्य अपात्र ठरल्यानंतर २४ संख्याबळानुसार अविश्वासासाठी १८ सदस्यांचीही पूर्तता सेनेकडून होऊ शकत नाही. त्यामुळेच मयेकर यांच्या नगराध्यक्षपदाला धोका नाही. मात्र, हा दोन पक्षांतील विश्वासाचा प्रश्न आहे. त्यात भाजपने विश्वासघात केला तर पुढील निवडणुकीत युती नाही, हाच निर्णय सेनेकडून घेतला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यानुसार सर्व ७ प्रभागांत निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.