भाट्ये खाडीचे मुख भरले गाळाने, मच्छिमारांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST2021-03-21T04:29:11+5:302021-03-21T04:29:11+5:30

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचला आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी ...

The mouth of Bhatye Bay is filled with silt, dangerous for fishermen | भाट्ये खाडीचे मुख भरले गाळाने, मच्छिमारांसाठी धोकादायक

भाट्ये खाडीचे मुख भरले गाळाने, मच्छिमारांसाठी धोकादायक

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचला आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी असलेला हा मार्ग मच्छिमारांसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे हा गाळ उपसावा, अशी मागणी मच्छिमारांकडून पुढे येत आहे.

जिल्ह्यात मासेमारी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याच्या दृष्टीने शासनाने गांभिर्याने विचार करणे अवश्यक आहे. जिल्ह्यातील बंदरे, खाड्या गाळाने भरल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हा गाळ उपसलेलाच नाही. त्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीचा वापर करून ही बंदरे साफ केल्यास त्याचा मोठा फायदा मच्छिमारांना होणार आहे. मात्र, याकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न नेहमीच मच्छिमारांना सतावत राहिलेला आहे.

भाट्ये खाडीच्या आसपास असलेल्या राजीवडा, कर्ला, जुवे, फणसोप, भाट्ये आदी गावांमध्ये मच्छिमार राहतात. या गावांमध्ये हजारो लोक मच्छिमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. येथील कुटुंबीय मासेमारीवरच अवलंबून आहेत. भाट्ये खाडी परिसरातील मासेमारी नौकांना खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाण्यासाठी भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे.

मांडवी बंदर हा मासेमारीचा मार्ग गाळाने भरलेला आहे. या बंदरातील गेली कित्येक वर्षे गाळच उपसलेला नाही. त्यामुळे येथून समुद्रात जाताना मच्छिमारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हे मुख गाळाने भरल्याने अनेकदा अपघातही घडले आहेत. मासेमारी नौका बुडाल्याने मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या गाळामुळे मासेमारी नौकांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते.

या बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ साफ करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथील लोकप्रतिनिधींच्याही वेळोवेळी ही बाब लक्षात आणूनही डोळेझाक केली जात आहे.

काेट

भाट्ये खाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेला गाळ उपसण्याबाबत गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे तसेच येथील लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत मच्छिमारांना केवळ आश्वासनांच्या खैरातीशिवाय काहीही हाती लागलेले नाही. या बंदरातील गाळ उसण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मासेमारीसाठी जाण्याचा मार्गच बंद होणार आहे.

- शब्बीर भाटकर

माजी चेअरमन, रत्नागिरी मच्छिमार सहकारी सोसायटी, राजीवडा.

Web Title: The mouth of Bhatye Bay is filled with silt, dangerous for fishermen