खेडमध्ये मनसेला जोर का झटका; सेनेचा स्वीकार
By Admin | Updated: August 13, 2015 22:52 IST2015-08-13T22:52:37+5:302015-08-13T22:52:37+5:30
धक्कातंत्र : तालुका उपाध्यक्षांसह सर्वच अडकले शिवबंधनात

खेडमध्ये मनसेला जोर का झटका; सेनेचा स्वीकार
खेड : खेड तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्यक्षांसह ४१ पदाधिकारी आणि १५२ कार्यकर्त्यांनी सोमवारी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात भगवा घेत स्वत:ला शिवबंधनात अडकवून घेतले. दुपारी ४ वाजता या सर्वांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केल्याने खेडसह अवघ्या जिल्हाभरात खळबळ उडाली आहे, त्यामुळे खेडमध्ये आता मनसे नावापुरतीच उरली असल्याचे बोलले जात आहे.
अचानक झालेल्या या पक्षप्रवेशाने सारेच अचंबित झाले असून, रामदास कदमांच्या या किमयेने मनसे पदाधिकाऱ्यांनाही बुचकाळ्यात टाकले आहे. याबाबत मनसेचे वैभव खेडेकर यांना विचारले असता त्यांनी हा प्रक्षप्रवेश खोटा असल्याचे सांगितले आहे. दोन-चार कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याने मनसेचे फार काही बिघडणार नाही. त्याचा जे तळ्यात- मळ्यात होते, तेच दोन - चार कार्यकर्ते इकडे - तिकडे गेले असतील, त्याने मनसेला काही फरक पडत नाही. त्या किरकोळ गोष्टीचा बाऊ करण्यात आला असून, गेलेले कार्यकर्ते पैसे घेऊन गेल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले.
रामदास कदम यांच्या सांगण्यावरूनच मनसेचे हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्षप्रवेश केल्याचे समोर आले आहे. आगामी काळात दापोली अथवा गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या हेतूनेच रामदास कदमांनी ही खेळी केल्याचे राजकीय गोटातून बोलले जात आहे. याची पूर्वतयारी म्हणूनच रामदास कदमांनी मनसेला खिंडार पाडीत कासवगतीने पाऊल टाकायला प्रारंभ केला आहे. असे असले तरी मनसेच्या वैभव खेडेकर यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकाराची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. या प्रकाराने सेनेत जल्लेषाचे वातावरण आहे.
महत्त्वाचा पक्ष प्रवेश
खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर येथे तो मनसेला बसलेला धक्का असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेशामुळे मनसेला खेडमध्ये बसलेला धक्का मोठा मानला जात आहे. मनसेचे संघटक असलेल्या वैभव खेडेकर यांच्या भागातील हा पक्ष प्रवेश असल्याने याबाबत राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळे अर्थ लावायला सुरूवात केला आहे. निवडणूक पार्श्वभूमीवर ते महत्त्वाचे आहे.