आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुक हिरमुसले

By Admin | Updated: July 3, 2016 23:37 IST2016-07-03T23:37:15+5:302016-07-03T23:37:15+5:30

पालिका निवडणूक : ’ते’ नगरसेवक नवीन वॉर्डच्या शोधात...

Many interested heroes because of quitting reservation | आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुक हिरमुसले

आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुक हिरमुसले

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभागांची नव्याने फेररचना करण्यात आल्यांनतर २ जुलैला झालेल्या नगरसेवकपदांच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुकांचे पत्ते गुल झाले आहेत, तर जुन्या ७ प्रभाग व २८ वॉर्ड्सची १५ प्रभाग व ३० वॉर्ड अशी फेररचना झाल्यानेही येत्या पालिका निवडणुकीत मतांची गोळाबेरीज करताना नाकीदम येण्याची भीतीही व्यक्त होत आहे. फेररचनेत आपला जुना वॉर्ड किती आहे व किती दुसऱ्या वॉर्डमध्ये गेला, याबाबतचे चित्र नवीन प्रभागरचना येत्या १५ जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर अधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी पालिकेच्या राजकीय क्षेत्रात ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
रत्नागिरी पालिकेची निवडणूक येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्यासाठी विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा आपले बस्तान आपल्या वॉर्डमध्ये बसवता यावे, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, प्रभाग व वॉर्ड फेररचना कोणाच्या पथ्यावर पडणार व कोणाच्या नाही, यावरच विद्यमान व इच्छुकांचे येत्या निवडणुकीतील राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.
रत्नागिरी पालिकेला आता २८ऐवजी ३० वॉर्ड मिळाल्याने ३० नगरसेवक संख्या राहणार आहे. सध्या पालिकेतील २८ नगरसेवकांमध्ये १५ शिवसेना, ८ भाजप, ४ राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस असे पक्षीय बलाबल आहे. पालिकेतील सेना-भाजप युती दोन वर्षांपूर्वीच तुटली आहे. युतीमार्फत सत्तेवर आल्याचा सर्वाधिक फायदा हा भाजपला झाला आहे. भाजपला पावणेचार वर्षे नगराध्यक्षपदाचा कालावधी मिळाला आहे. युती तोडल्यानंतर भाजपने नगराध्यक्षपद सोडले नाही. त्यामुळे शिवसेनेचा भाजपवर रोष आहे. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, उमेश शेट्ये यांच्यासह अनेक विद्यमान नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डमध्ये पुन्हा संधी मिळाली आहे. मात्र, प्रीती सुर्वे, बाळू साळवी, संजय साळवी व राहुल पंडित या विद्यमान नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये आरक्षण पडल्याने त्यांना दुसऱ्या वॉर्डचा शोध घ्यावा लागणार आहे. एकूणच रत्नागिरीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. (प्रतिनिधी)
उमेश शेट्ये : रत्नागिरी पालिकेत कॉँग्रेसबरोबर आघाडी होणार
रत्नागिरी पालिकेत सेना-भाजपची तुटलेली युती पुन्हा होण्याची शक्यता सध्या तरी धुसर असली तरी राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांची आघाडी होणार असल्याचे संकेत आहेत. रत्नागिरीत पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठीही वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. पालिकेची येणारी निवडणूक आघाडी करून लढवण्यात येणार आहे. जिल्हा प्रभारी माजी मंत्री भास्कर जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम व अन्य नेते यांची कॉँग्रेस नेत्यांबरोबर बैठक होऊन आघाडी होईल, असे नगरसेवक उमेश शेट्ये म्हणाले.
४जुने वॉर्ड किती सुरक्षित हे फेररचना जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार.
४आरक्षणे पडल्याने अनेकांचा अन्य वॉर्डचा शोध.
४वॉर्ड फेररचनेवर अनेकांचे भवितव्य अवलंबून.
४सेना-भाजप युतीची शक्यता धुसर.
४नव्या रचनेनुसार १५ प्रभागातील ३० वॉर्डमध्ये होणार निवडणूक.

Web Title: Many interested heroes because of quitting reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.