‘लोकमत’मुळे हवाई सफरीचे स्वप्न सत्यात उतरले
By Admin | Updated: July 1, 2016 23:39 IST2016-07-01T22:37:34+5:302016-07-01T23:39:57+5:30
चारूदत्त करपे --लोकमत संस्काराचे मोती

‘लोकमत’मुळे हवाई सफरीचे स्वप्न सत्यात उतरले
रत्नागिरी : ‘लोकमत’ आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत सहभागी झालो. जिल्ह्यातून माझी हवाई सफरकरिता निवड झाल्याचे कळले, तेव्हा विश्वासच बसत नव्हता. बाबा फसवतात, असेच वाटले. परंतु ‘लोकमत’ कार्यालयातून बोलावणे आले व त्यावेळी सांगितल्यावर खूप खूप आनंद झाला. एकटं जाणार म्हणून काहीशी भीती असली तरी विमान प्रवासाची हूरहूर होतीच. अखेर विमानाने दिल्लीत पोहोचलो. तेथील संपूर्ण दिवसात दिलेल्या भेटीतून आपण जे अनुभवले ते शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. माझ्या शालेय वयातील विमानप्रवास व दिल्ली भेट अखंड स्मरणात राहिलं, अशा भावना सेके्रड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, उद्यमनगरच्या चारूदत्त गंगाराम करपे याने व्यक्त केल्या.
गतवर्षी जुलैमध्ये ‘लोकमत’ची टीम आमच्या शाळेत आली होती. त्यावेळी त्यांनी संस्कारांचे मोती स्पर्धेविषयी माहिती दिली. यापूर्वी आपण २०१४च्या स्पर्धेत सहभागी झालो होतो. त्यावेळी देखील मला थंड पाण्याची बाटली बक्षीस मिळाली होती. स्पर्धेत सहभागी झाल्यावर बक्षीस मिळतं, याच उद्देशाने आपण दुसऱ्या वर्षीदेखील स्पर्धेत सहभागी झालो. स्पर्धा कालावधीत सलग शंभर दिवस परिपाठ प्रसिध्द होतो. या परिपाठात दररोज प्रसिध्द होणारी माहिती महत्वपूर्ण आहे.
माझी शाळा सकाळची असल्याने दुपारी घरी आल्यावर मी दररोज पेपर वाचन करतो. परिपाठाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर दररोज कूपन कापून चिकटवत असे. ८५ कूपन चिकटवून पूर्ण झाल्यानंतर शाळेतील बॉक्समध्ये जमा केले. स्पर्धेनंतर मीदेखील शैक्षणिक सत्रातील अभ्यासक्रमात व्यस्त होतो. परंतु ज्यावेळी ‘हवाई सफर’साठी माझी निवड झाली त्यावेळचा आनंद अवर्णनीयच होता. माझ्या मित्रांना जेव्हा बातमी कळली तेव्हा त्यांनी माझे कौतुक केले.
‘लोकमत’तर्फे विमान प्रवासासाठी जात असताना आम्ही रत्नागिरीतून प्रथम कोल्हापुरात पोहोचलो. तेथे आमची व्यवस्था छान बंगल्यात करण्यात आली होती. आई-बाबांशिवाय प्रवास करायचा, याची सुरुवातीला भीती होती. परंतु विमान प्रवासाचे कुतुहल होते. कोल्हापुरातून आम्ही बोलेरो गाडीतून मुंबईत पोहोचलो. माझ्याबरोबर अन्य जिल्ह्यातील चार विद्यार्थी होते. हॉटेल अॅबोर्टमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती. विमानाने जायच्या दिवशी आम्हाला सकाळी लवकर उठवण्यात आले. संपूर्ण आवरून आम्ही सात वाजता विमानतळावर पोहोचलो. अखेर विमानात बसलो... सुरुवातीला विमान टेक आॅफ घेताना हूरहूर होती. ९ वाजता विमानाने आम्ही दिल्लीत पोहोचलो. दिल्लीतही आमच्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे आम्हाला इंडिया गेट, बालभवन, रेल्वे म्युझियम दाखवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट झाली. राजनाथसिंह यांनी सर्वांना पेन गिफ्ट दिले. सुरेश प्रभू यांच्याशी संवाद साधताना कोकण रेल्वेचा दुसरा ट्रॅक केव्हा होईल, असे विचारले. सध्या काम सुरू असून, लवकरच ट्रॅक होईल, असे त्यांनी सांगितले. मी विचारलेल्या प्रश्नाचे त्यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)
‘हवाई सफर’ आनंद ‘लोकमत’मुळे प्राप्त झाला. एकट्याला पाठवायची धकधक होती. परंतु त्याची छान ट्रीप झाली. त्याला विमान प्रवासाचा आनंद घेता आलाच, परंतु महत्त्वपूर्ण गोष्टी पाहायला मिळाल्या. मंत्रीगणांशी संवाद झाला, याचे तर फारच कौतुक वाटत आहे. स्पर्धेमुळे लोकमत घरी येऊ लागला. घरातील सर्व आवरल्यानंतर दररोज वृत्तपत्र वाचन करते. महिलांसाठी सखी, युवकांसाठी आॅक्सिजन व रविवारची ‘मंथन’ पुरवणी छानच आहे. वृत्तपत्राची भाषा, छपाई, मांडणी उत्कृष्ट आहे.
सोनिया करपे (आई)
आम्ही ‘लोकमत’चे नियमित वाचक आहोत. सकाळी आमच्या घरी पेपर पडतो. दिवसभराचा दिनक्रम नियोजित असला तरी पेपर वाचन आवडीने करतो. आमच्या वाचनाबरोबर मुलाला स्पर्धेत भाग घेता आला. स्पर्धेत सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले, शिवाय जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळाले. माझ्या मुलाला दिल्लीतील बालभवन, राष्ट्रपती भवन, रेल्वे म्युझियम, इंडिया गेट पाहायला मिळाले. केंद्रीय मंत्र्यांची भेट व संवाद हे ‘लोकमत’मुळेच शक्य झाले.
गंगाराम रामदास करपे, (वडील)