महामार्गावर अवजड वाहनांचे ओझे...
By Admin | Updated: April 6, 2015 01:31 IST2015-04-06T01:29:37+5:302015-04-06T01:31:09+5:30
पोलिसांची दमछाक : घाटातील अवघड वळणे, उतारांचे आव्हान

महामार्गावर अवजड वाहनांचे ओझे...
फुणगूस : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाढलेल्या अवजड वाहनांच्या रहदारीने वाहतूकीची कोंडी होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहतूक पोलीसांचीही धावपळ झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर होवू घातलेले अनेक कारखाने, प्रकल्प, नवनवीन उद्योगधंदे आदींसाठी लागणारे अवजड यांत्रिकी साहित्य वाहतूक करण्यासाठी मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचा वापर होत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वाहतूक वाढली आहे. याखेरीज वाळू, खडी, चीरा, तसेच मासळीची वाहतूक करणारे डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो, मोठमोठे कंटेनर वाहून नेणाऱ्या इतर गाड्या यांची वाहतूक नित्याची झाली आहे. याहीपेक्षा धोकादायक म्हणजे तीस चाळीस चाकांच्या गाड्याही या मार्गावरुन धाऊ लागल्या आहेत.
काहीवेळा या अवजड वाहनावर एवढे अवाढव्य सामान असते की त्यामुळे महामार्गावरील टेलिफोन तारा, झाडांच्या फांद्या तुटून पडतात. अरुंद मोऱ्या आणि वेड्यावाकड्या वळणांमुळे घाटरस्त्यामुळे या अवजड वाहनांसाठी डोकेदुखी ठरला आहे. घाटातून प्रवास करताना मोठ्या वळणात ही वाहने गेल्याशिवाय दोन्ही बाजूच्या वाहनांना जागा मिळणे दुरापास्त होते. महामार्गावरील बहुतेक सगळ्या ब्रिटीशकालीन पुलावरही अशीच स्थिती असते. कधी कधी अरुंद पुलांच्या मध्यावर असे अवजड वाहने बंद पडल्यास दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत असल्याचे दृश्य पाहायला मिळते आहे.
संगमेश्वरच्या शास्त्री आणि सोनवी पुलावर अशी स्थितीही नेहमीच पहायला मिळत आहे. कामथे, निवळी घाटातील उतारावर, अशा अवजड वाहनांचे अपघात कायम घडतात. ही वाहने घाटातून प्रवास करीत असताना त्यांचा वेग अतिशय संथ असतो. परिणामी त्यांना ओव्हरटेक करणाऱ्या आणि समोरच्या वाहनांना नेहमीच अपघात घडतात. या सर्व प्रकारात वाहतूक पोलिसांची तारांबळ उडते. अपघात घडल्यास अशा अवजड वाहनांना बाजूला करुन वाहतूक झाली असल्यास ती सोडवण्यासाठी पोलिसांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. जोपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण होत नाही, तोपर्यंत पोलिसांना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. (वार्ताहर)