वृक्ष लागवडीची जय्यत तयारी
By Admin | Updated: June 29, 2016 23:54 IST2016-06-29T21:55:10+5:302016-06-29T23:54:59+5:30
‘सेल्फी विथ ट्री’ : शासनाची खास वेबसाईट

वृक्ष लागवडीची जय्यत तयारी
वृक्ष लागवडीची जय्यत तयारी ‘सेल्फी विथ ट्री’ : शासनाची खास वेबसाईट
मेहरुन नाकाडे --रत्नागिरी
वन महोत्सव राबवत असताना शासन नवनवीन तंत्रांचा वापर करीत आहे. सध्या सेल्फीचे वेड असल्याने ‘सेल्फी विथ ट्री’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने ६६६.ेंाँंङ्म१ी२३.ॅङ्म५.्रल्ल हे संकेतस्थळ सुरू केले आहे. १ जुलै रोजी संकेतस्थळ सुरू होणार असून, ३ जुलै रोजी बंद होणार आहे. झाडे लावतानाचा फोटो काढून संकेतस्थळावर पाठवायचा आहे. यातून उत्कृष्ट फोटोची निवड केली जाणार आहे. लकी ड्रॉ पध्दतीने निवडक फोटो काढले जाणार आहेत. शासनाने त्यासाठी अद्याप बक्षीस जाहीर केलेले नाही. बक्षीस लवकरच जाहीर केले जाणार आहे. मात्र, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारीवगळता अन्य सर्वांना या उपक्रमात सहभागी होता येईल.
महाराष्ट्र शासनातर्फे ‘चला तर लावू या जगवू या वृक्ष आणि घडवू या हरित महाराष्ट्र’ या ब्रीद वाक्याखाली वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एक लाख ९२ हजार ४७९ वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. लागवडीसाठी खड्डे तयार करण्यात आले असून, रोपवाटिकाही सज्ज झाल्या आहेत. तेथून रोपांचे वितरण सुरू आहे.
सामाजिक वनीकरण व वन विभाग यांच्या नेतृत्त्वाखाली विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खासगी संस्था, कंपन्यांकडून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे १० हजार व वन विभागातर्फे ३६ हजार, तसेच इतर विविध कार्यालये, संस्थांकडून एक लाख ४५ हजार ८०९ इतकी झाडे लावण्यात येणार आहेत. खासगी, पडिक, गावठाण जागेत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. झाडे लावण्यासाठी खड्डे काढण्यात आले आहेत. प्रत्येक कामाची आॅनलाईन माहिती शासनाकडे कळवण्यात येत आहे. वृक्ष लागवड करण्याबाबत प्रचार व प्रसारासाठी ठिकठिकाणी वृक्षदिंंडी, चर्चासत्र, प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कामाची माहिती संकलित करण्यात येत आहे. साग, सुरू, चाफा, गावठी आंबा, गुलमोहोर, मेनझियम, शिवण, आवळा, रेन ट्री, कोकम आदी विविध प्रकारची रोपे शासकीय रोपवाटिकांमध्ये उपलब्ध आहेत. कृषी विभागाच्या रोपवाटिकेतून आंबा, काजू, नारळ, चिकू आदी प्रकारची रोपे वितरीत केली जात आहेत. विविध २९ कार्यालयांतर्फे २ हजार ४३८ ठिकाणी १ लाख ४० हजार २०९ हेक्टर क्षेत्रावर एक लाख ९२ हजार ४७९ झाडे लावण्यात येणार आहेत.
निवडणुकीच्या वेळी नियंत्रणासाठी ज्याप्रमाणे विशेष समिती कार्यरत असते, त्याप्रमाणे ‘वन महोत्सव २०१६’साठी समिती गठीत करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. केवळ झाडे लावून हा कार्यक्रम न संपवता लावलेली सर्व झाडे जगवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. दर तीन महिन्यांनी विभागीय आयुक्त लागवडीबाबत आढावा घेणार आहेत. सर्व कार्यालये व स्थानिक संस्थांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभत असून, प्रत्येकाने नियोजन केले आहे, त्यामुळे रोपांसाठी मागणी वाढत आहे. नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे.
- सी. एल. धुमाळ,
अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, रत्नागिरी