‘जलयुक्त’च्या ग्रामसभेस अधिकाऱ्यांची पाठ
By Admin | Updated: November 19, 2015 00:44 IST2015-11-18T23:36:56+5:302015-11-19T00:44:22+5:30
ग्रामसभेचा ठराव वरिष्ठांना कळवणार

‘जलयुक्त’च्या ग्रामसभेस अधिकाऱ्यांची पाठ
चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीची जलयुक्त शिवार योजनेसाठीची विशेष ग्रामसभा कुटगिरी - येडगेवाडी येथे बुधवारी झाली. या ग्रामसभेकडे शासनाच्या खातेप्रमुखांनी पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
जलयुक्तसारख्या महत्त्वाच्या योजनेची कामे निवडण्यासाठी ग्रामसभा घेतली असताना पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील कोणतेही अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. येडगेवाडी ही पाणीटंचाईग्रस्त वाडी असल्याने दरवर्षी या वाडीला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करावा लागतो. एवढे गंभीर प्रश्न असूनही पाणीपुरवठा अथवा पंचायत समितीतील एकही जबाबदार अधिकारी हजर राहू शकला नाही. यावर्षी संगमेश्वर तालुक्यातील १५ गावे ही जलयुक्तमध्ये घेतली गेली आहेत. त्यापैकी ५ गावे अंमलबजावणीसाठी निवडली जाणार आहेत. यातून गंभीर पाणी समस्या असणाऱ्या अथवा शासन सिंचन उपलब्ध करून देण्यास आवश्यकता असणाऱ्या गावांचा प्रथमदर्शी समावेश होऊ शकतो.
येडगेवाडीची पाण्याची टंचाई लक्षात घेता ही वाडी पाचपैकी प्रथम क्रमांकामध्ये बसेल, अशी स्थिती आहे. याचे निकष ठरविण्यासाठीच्या सभेला पाणीपुरवठा विभागच गायब होता. आजच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी कायमस्वरुपी पाणी समस्या सोडवण्यासाठी आम्हाला धरणातून पाणी उचलून द्यावे, त्यामुळे आमचा पाण्याचा प्रश्न निकाली निघेल तर उपस्थित असलेल्या महसूलच्या मंडल अधिकारी, कृषीचे सुस्तरफोड, तर ग्रामसेवक जाधव यांनी ग्रामसभेचा ठराव वरिष्ठ कार्यालयाला कळविला जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)