कोकणला हवे पाण्याचे नियोजन हवे

By Admin | Updated: October 21, 2014 23:37 IST2014-10-21T22:40:35+5:302014-10-21T23:37:45+5:30

कोट्यवधींचा खर्च : पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र मोठे

Konkan needs good water planning | कोकणला हवे पाण्याचे नियोजन हवे

कोकणला हवे पाण्याचे नियोजन हवे

एजाज पटेल- फुणगूस -उन्हाळा सुरु झाला की पाणीटंचाईची समस्या डोके वर काढू लागते. या समस्येवर मात करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. परंतु ते घटकेचे घड्याळ असल्याने मूळ दुखणे कमी होत नाही. खऱ्या अर्थाने पाणीटंचाईवर मात करायची असेल तर वाया जाणारे पाणी अडवणे, जिरवणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीचे क्षेत्र मोठे आहे.
पर्जन्यमानानुसार पिकात बदल केला असला तरी पावसाच्या लहरी कारभारामुळे हे वेळापत्रक बिघडते. परिणामी हक्काची पिकेही वाया जातात. पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जलपुनर्भरणा सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. मात्र खेडोपाड्यापर्यंत ही योजना अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पूर्णपणे रुजलेली नाही. अजूनही ग्रामीण भागात अनेक गावात जलपुनर्भरण म्हणजे काय ते माहीतच नाही. पाणीटंचाईसारख्या महत्वाच्या प्रश्नाबाबतची ही उदासीनता संताप आणणारी आहे. कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, माती बंधारे, गावतळी अर्ध बांध याकडे लक्ष दिले गेले नाही. काही ठिकाणी खर्च होऊनही कामे न झालेली तसेच अपूर्ण ज्या ठिकाणी कामे झाली त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.
या सर्व गोष्टी योग्यरितीने न केल्यामुळे जिल्ह्यात उपयुक्तता असूनही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ अनेक वाड्यावस्त्यांवर येत आहे. यासाठी उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता आताच अधिकारी स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास गाव पाणीटंचाई मुक्त होऊ शकतो. यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. कोकणात येणारा काळ पाण्यासाठी संघर्षाचा ठरेल असे चिन्ह आहे. मात्र यातही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे.

कोकणातील शेती पावसावर अवलंबून
जलपुनर्र भरण योजना आवश्यक
पाण्याची पातळी वाढण्यासाठी उपाययोजना आवश्यक
ग्रामीण भागात प्रबोधन हवे
कोल्हापूरी बंधारे, गावतळी अर्ध बांध,
पाणी अडवा , पाणी जिरवा

Web Title: Konkan needs good water planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.