जाधव - कदम एकत्र येणार?
By Admin | Updated: June 30, 2016 23:11 IST2016-06-30T23:08:12+5:302016-06-30T23:11:26+5:30
उत्सुकता : राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या पाग येथे मेळावा

जाधव - कदम एकत्र येणार?
सावर्डे : पाग येथील लक्ष्मीबाई माटे सभागृहात २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यादरम्यान एकाच व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. तसे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी बळ मिळून पक्ष संघटना मजबूत होण्यास हातभार लागेल, असे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाने भास्कर जाधव यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. माणसे ओळखण्याची पारख, हातोटी यामुळे ते सर्वपरिचित आहेत. पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. माणसे जोडण्याची कला त्यांना चांगली अवगत आहे. वक्तृत्व शैली आणि पहाडी आवाजमुळे कार्यकर्ता आकृष्ट होतो. गुहागरात आमदार जाधव यांनी भाजपच्या विनय नातू यांना हादरा देत त्या पक्षाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काही राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीकडून तालुकानिहाय मेळाव्यातून कार्यकर्ते व मतदारांचा कल आजमावण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेता पक्ष सोडून गेला तर त्यांच्यावर अवलंबून असणारी दुसरी फळी संभ्रमावस्थेत पडते.
नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भास्कर जाधव - रमेश कदम दिलजमाई होणे आवश्यक आहे. अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीला गटातटाच्या राजकारणाने घेरले आहे. जो तो आपली प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये पक्षाचे नुकसान होत आहे. चिपळूणच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून, जाधव-कदम एकत्र आले तर राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. हे शक्य होईल का? असा पक्षातील नेत्यांपुढे प्रश्न पडला आहे. यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जाधव यांनी राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी शिबिर घेण्यास सुरूवात केली आहे. त्याला रमेश कदमांची साथ मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भास्कर जाधव यांच्यावर जबाबदारी.
भास्कर जाधव, रमेश कदम एकत्र आल्यास पक्षाला बळकटी.
दिलजमाई होण्याची कार्यकर्त्यांची इच्छा.