चिपळूणच्या महापुराचा महाअनुभव; वर्ष लोटूनही सर्वसामान्यांच्या मनात भीती

By संदीप बांद्रे | Published: July 22, 2022 07:03 PM2022-07-22T19:03:19+5:302022-07-22T19:03:55+5:30

केवळ ऐकताना आजही अंगावर शहारे येतात, असा अनुभव हजारो चिपळूणकरांनी घेतला, त्या गोष्टीला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. २२ जुलै २०२१. सारे होत्याचे नव्हते करणारा दिवस.

It has been one year since the flood of Chiplun, There is still fear in the minds of the common people | चिपळूणच्या महापुराचा महाअनुभव; वर्ष लोटूनही सर्वसामान्यांच्या मनात भीती

चिपळूणच्या महापुराचा महाअनुभव; वर्ष लोटूनही सर्वसामान्यांच्या मनात भीती

Next

संदीप बांद्रे

चिपळूण : केवळ ऐकताना आजही अंगावर शहारे येतात, असा अनुभव हजारो चिपळूणकरांनी घेतला, त्या गोष्टीला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. २२ जुलै २०२१. सारे होत्याचे नव्हते करणारा दिवस. पाऊस आला आणि त्याने काहीही न पाहता फक्त लुटून नेले. किंमत मोठी मोजावी लागली, पण आयुष्यभराचा अनुभव दिला त्या पावसाने. सगळं काही विस्कटून टाकणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी काय करायला हवे, हे या पावसाने शिकविले. सामान्य माणसाला, व्यापाऱ्यांना, प्रशासनाला, गरिबाला, श्रीमंताला, सर्वांना या पावसाने खूप काही शिकविले. ही शिकवण घेऊनच लोक पुन्हा उभे राहत आहेत.

चिपळूण, खेड व लांजा या शहरांसाठी तो दिवस महाप्रलंयकारीच ठरला. चिपळूणच्या महापुरात तर तब्बल २४ तास उलटून गेले तरी कोणतीही मदत पोहोचली नव्हती. कुणी स्वयंपाकघरात ओट्यावर दिवसभर उभा होता, कुणी तासन् तास पोटमाळ्याचा आधार घेतला होता, अगदीच नाईलाज झाल्याने कुणी कौलावर चढून मुसळधार पावसात उभा होता, काहींनी जगण्याचीच आशा सोडली होती. शहरासह तालुक्यांतील ४८ गावांचे सुमारे १४५३ कोटींचे नुकसान करणाऱ्या या महाभयंकर जलप्रलयातून बचावलेल्या चिपळूणकरांना वर्षभरानंतरही त्या किंकाळ्या व मदतीसाठी टाहो फोडणारा आवाज आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो.

वर्षभरात येथील जनजीवन कमालीच्या वेगाने पूर्ववत झाले आहे. त्याचं श्रेय जेवढं येथे तत्परतेने झालेल्या मदतकार्याला देता येईल, तितकंच हार न मानता परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या चिपळूणकरांनाही द्यावं लागेल. २०२१ चा महापूर हा चिपळूणमध्ये याआधी आलेल्या कोणत्याही महापुराच्या तुलनेत अधिक प्रलंयकारक होता. बाजारपेठ नव्हे, तर ९० टक्के चिपळूण शहर पाण्याखाली गेलं होतं. घर आणि गाळे असे व्यापाऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले. महापुराच्या पाण्याने बाजारपेठेतच समुद्रसपाटीपासून तब्बल ८ ते १० मीटरपर्यंत उंची गाठली होती. चिपळूणच्या इतिहासात महापुराने प्रथमच इतकी उंची गाठली होती. आता बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाच नव्हे, तर बहुतांशी इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबात महापुराची भीती वाढली आहे.

या प्रसंगातून एवढा धडा मिळाला की, आपत्ती व्यवस्थापनाची दिशा कशी असावी. आपत्ती व्यवस्थापनच्या यंत्रणेत अनेक वर्षांत जे झालं नाही, ते अवघ्या एका वर्षात बदल घडलं आहे. महापुरामुळे प्रशासन आपत्ती व्यवस्थापनात सक्षम झाल्याचा महानुभव येत आहे. भविष्यात कितीही मोठी नैसर्गिक आपत्ती व संकट आले तरी ते सामना करण्यासाठी तयार असतील. चिपळूणचे प्रशासन तर तिवरे धरणफुटी, निसर्ग चक्रीवादळ आणि गतवर्षी महापूर असे सलग तीन वर्षे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करत आहेत. महाग पडला असला तरी चिपळूणच्या पुढच्या अनेक वर्षांसाठी हा धडा उपयोगी पडणार आहे.

जखम मोठी, मलमपट्टी तोकडी!

महापुरात चिपळूणचे अतोनात नुकसान झाले होते. शहरासह तालुक्यातील ४८ गावांचे सुमारे १,४५३ कोटी ८० लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे जखम मोठी मलमपट्टी तोकडी अशी काहीशी स्थिती निर्माण झाली होती. तरीदेखील वरवरची मलमपट्टी का होईना शासनाने अनुदान स्वरूपात काही मदत दिली. यामध्ये पुराचे पाणी घरात घुसून नुकसान, घरांची पडझड (अंशतः व पूर्णतः नुकसान), मत्स्य व्यवसाय, कारागीर व बलुतेदार, मदत छावणी व कचरा उचलण्यासाठी एकूण ११ कोटी ४६ लाख ९ हजार ३०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी ९ कोटी २७ लाख ३३ हजार ८२६ रुपयांचे अनुदान वाटप केले

स्थलांतराचे मोठे पाऊल

गतवर्षी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी भूस्खलनच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये काही जुन्या लोकवस्तीला धोका पोहोचला. त्यामुळे यावर्षी त्या त्या गावातील कुटुंबांचे स्थलांतर सुरक्षित स्थळी केले आहे. यामध्ये पेढे परशुराम ( दुर्गवाडी, ब्राम्हणवाडी), नांदगाव (डोंगबांग, सुटरवाडी), नांदीवसे (राधानगर), पेढांबे (रिंगी धनगरवाडी), मिरजोळी (जुवडबेट), कोळकेवाडी ( खरवाज, माचबौद्धवाडी), कळकवणे आदी सात गावांतील ९१ कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यातील काही कुटुंबांचे स्थलांतर जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, तसेच कोयना प्रकल्प खोल्यांमध्ये केले आहे.

सार्वजनिक मालमत्ता सावरताहेत

गतवर्षीच्या महापुरात चिपळूण शहरातील व्यापारी, किरकोळ दुकानदार व रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र त्या महापुरात नगर परिषद मालकीच्या व सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानाची भरपाई आजतागायत झालेल्या नाही. नगर परिषदेचे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या नाट्यगृहाचा प्रवेशद्वारच उघडलेले नाही. नूतनीकरणावर सुमारे साडेनऊ कोटींचा केलेला खर्च आज अक्षरशः वाया गेला आहे. नगर परिषदेच्या इतर वास्तू व सार्वजनिक स्वच्छता गृहाचे अजूनही दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तसेच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचेही महापुरात मोठे नुकसान झाले होते. तेही आता हळूहळू सावरत आहे.

महावितरण, एसटी अडचणीतच

महापुरामुळे महावितरणचे सुमारे २ कोटींचे नुकसान झाले होते. चिपळूण शहरासह सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये वसलेल्या गावात अतिवृष्टीने महावितरणचे प्रचंड नुकसान झाले होते. महावितरणची शहरातील मुरादपूर व खेर्डी येथील उपकेंद्रे पाण्याखाली गेली होती. तर उच्चदाब असलेले २२४ व लघुदाबचे २५६ विद्युत पोल महापुरात कोसळले होते. तसेच २५ विद्युत रोहित्र महापुरात निकामी झाले होते. आतापर्यंत ४ हजार विद्युत मीटर उपलब्ध झाले असून जुने मीटर बदलण्यात आले आहेत. परंतु थकीत रकमेमुळे महावितरण अडचणीत आले आहे. तसेच चिपळूण एसटी महामंडळाचीदेखील हीच परिस्थिती आहे. आधी महापुराने मारले, त्यानंतर कर्मचारी संपाने आणि आता अतिवृष्टीमुळे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेला नदी सवंर्धन अंतर्गत वाशिष्ठी व शिवनदीचा प्रस्ताव बंदविकास खात्यामार्फत पाठविण्यात येणार असून त्याचा पाठपुरावा करणार आहे. त्याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गाळ उपशासाठी तातडीने प्रयत्न करणार आहे. त्यासाठी निम्मी रक्कम मिळाली असून उर्वरीत निधीसाठी प्रयत्नात आहे. सरकार बदलल्याने काही अडचणी येऊ शकतात. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या कामाचा आढावा घेत असून ऑक्टोबर महिनाअखेरीस ते दौरा करणार आहेत. - शेखर निकम, आमदार

Web Title: It has been one year since the flood of Chiplun, There is still fear in the minds of the common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.