सुंदर रत्नागिरीसाठी पुढाकार
By Admin | Updated: July 18, 2015 00:15 IST2015-07-17T22:15:31+5:302015-07-18T00:15:05+5:30
जाणीव, जायंट्सचा उपक्रम : संगोपन विनामूल्य करण्याचा संस्थांचा निर्धार

सुंदर रत्नागिरीसाठी पुढाकार
रत्नागिरी : स्वच्छ, सुंदर रत्नागिरीसाठी येथील जाणीव फाऊंडेशन आणि जायंट्स ग्रुप आॅफ रत्नागिरी या दोन सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील साळवी स्टॉप ते जयस्तंभपर्यंत रस्त्याच्या दुभाजकामध्ये सुमारे २००० शोभिवंत झाडे लावून त्यांचे संपूर्ण संगोपन विनामूल्य करण्याचे ठरविले आहे. साळवी स्टॉप ते मारूती मंदिर या रस्त्यावरील दुभाजकावर जाणीव फाऊंडेशनने, तर मारूती मंदिर ते जयस्तंभ या रस्त्यावरील दुभाजकावर जायंटस् ग्रुप झाडे लावून त्यांचे संगोपन करणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा उपक्रम स्तुत्य असून, या झाडांचे विनामूल्य संगोपन करणार आहेत, याबद्दल नगराध्यक्षांनी गौरवोद्गार काढले.या उपक्रमासाठी नगरपरिषदेकडून २००० शोभिवंत झाडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दुभाजकामधील गवत काढून टाकण्यासाठी या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गेला आठवठाभर कंबर कसली होती.
या उपक्रमाला नागरिकांचाही उत्तम सहभाग लाभत आहे. त्याचबरोबर येथील जिद्दी माऊंटेनिअरिंगचे अध्यक्ष धीरज पाटकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारीही या उपक्रमात सहभागी झाले आहेत. दोन्ही संस्थांनी या लावण्यात येणाऱ्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. या उपक्रमात नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी जाणीव फाऊंडेशनचे नीलेश मुळ्ये, उमेश महामुनी, संजय शिंदे, अमित सामंत, सुशील जाधव, विद्या गर्दे, वैशाली महामुनी, प्राजक्ता मुळ्ये, मंजिरी पटवर्धन तसेच जायंट्स ग्रुपचे भूषण मुळ्ये, श्रीकांत भिडे, दीपक देवल, धीरूभाई पटेल, महेश साठे, सुनील सहस्त्रबुद्धे, राजेश गांगण, शंकर स्वामी, प्रवीण डोंगरे तसेच जायंटस्चे युनिट संचालक संजय पाटणकर यांनी विशेष मेहनत घेतली.
दोन्ही संस्थांतर्फे सतत विविध उपक्रम सुरू असतात. जायंट्स ही संस्थाही दरवर्षी विविध उपक्रम राबवीत असते. यावर्षीही संस्थेने ग्रामीण भागातील १००० विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
दुभाजकात झाडे लावण्याचे काम सुरू
साळवी स्टॉप ते मारूती मंदिर या रस्त्यावरील दुभाजकामध्ये जाणीव फाऊंडेशनतर्फे १००० झाडे लावण्यात येणार आहेत, तर त्यापुढे म्हणजे मारूती मंदिर ते जयस्तंभ या रस्त्यावरील दुभाजकामध्ये जायंट्स ग्रुपतर्फे १००० झाडे लावण्यात येणार आहेत. या झाडांमधील साफसफाई, खत घालणे, पाणी घालणे व झाडांचे कटिंग करून आकार देणे, ही जबाबदारी दोन्हीही संस्था पेलणार आहेत.