मुख्याधिकारी नसल्याने मंडणगडात गैरसोय
By Admin | Updated: June 30, 2016 00:04 IST2016-06-29T22:02:15+5:302016-06-30T00:04:59+5:30
नगरपरिषद : दाखले, परवाने मिळण्यात अडचण...!

मुख्याधिकारी नसल्याने मंडणगडात गैरसोय
मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी म्हणून पदभार असलेल्या तहसीलदार वैशाली जाधव यांची दापोली येथे बदली झाल्यामुळे नगरपंचायतीचे मुख्याधिकारीपद अद्याप रिक्त आहे. मुख्याधिकारी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध दाखले व नागरिकांना परवाने मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. येथे तत्काळ मुख्याधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी येथील नगरसेवकांनी केली आहे.
मंडणगड नगरपंचायत अस्तित्त्वात आल्यानंतर येथील तहसीलदार दळवी यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता. परंतु, एक महिन्यापूर्वी तहसीलदार जाधव यांची दापोली येथे बदली झाली. त्यामुळे त्यांनी नगरपंचायतीचा पदभार सोडला किंवा कसे? याबाबत माहिती उपलब्ध नाही. परंतु, मंडणगड येथे पावणेकर हे नवीन तहसीलदार म्हणून हजर झाले. त्यांना नगरविकास खात्याचे आदेश नसल्यामुळे त्यांनी नगरपंचायतीचा पदभार स्वीकारलेला नाही.
गेला महिनाभर शहरातील नागरिकांचे विविध परवाने, पावसाळ्यात करावयाची उपाययोजना किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे विद्यार्थ्यांचे दाखले अशी महत्त्वपूर्ण कामे मुख्याधिकाऱ्यांअभावी रखडलेली आहेत. नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन सर्व नगरसेवकांनी मंगळवारी तहसीलदार पावणेकर यांची भेट घेतली.
तहसीलदारांनी आपल्याला नगरविकास खात्याचे कोणतेही अधिकार नाहीत, त्यामुळे आपण पदभार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. नगरसेवकांनी आमदार संजय कदम यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. परंतु, तहसीलदारांनी त्यांनाही तेच उत्तर दिले.
आदेश नसताना परस्पर पदभार स्वीकारणे अयोग्य असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले. त्यामुळे येथे कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळावा, अशी मागणी नगरसेवकांसह नागरिकांनी केली आहे. दरम्यान, मंडणगडमध्ये मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांचीही कामे खोळंबली आहेत. याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी मंडणगडातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
तहसीलदार : पदभार स्वीकारण्यास नकार
तहसीलदारांची बदली झाल्यामुळे नवीन अधिकारी नाही.
नगरविकास खात्याचे आदेश नसल्याने नवीन तहसीलदारांचा पदभार स्वीकारण्यास नकार.
मंगळवारी सर्व नगरसेवकांनी घेतली तहसीलदारांची भेट.
आमदार संजय कदम यांची शिष्टाईही असफल.
विद्यार्थी, नागरिक यांना दाखले मिळत नसल्याने नाराजी.
तत्काळ मुख्याधिकारी देण्याची नगरसेवकांची मागणी.