मान्सून आला तरी तहान मात्र भागेना
By Admin | Updated: June 15, 2014 00:35 IST2014-06-15T00:34:05+5:302014-06-15T00:35:23+5:30
भीषण पाणी टंचाई : वाड्यांची संख्या वाढली

मान्सून आला तरी तहान मात्र भागेना
रत्नागिरी : गतवर्षीच्या पाणीटंचाईपेक्षा यंदा पाणीटंचाईग्रस्त वाड्यांची संख्या जास्त आहे. पाऊस सुरु झाला असला तरी जिल्ह्यातील १२२ गावांतील २९० वाड्यांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई सुरु आहे.
मागील आठवड्यात १२१ गावांतील २८४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरु होती. या टंचाईग्रस्तांना १३ शासकीय आणि १५ खासगी टँकर अशा एकूण २८ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत होता़ आठवडाभराच्या कालावधीत यामध्ये १ गाव आणि ६ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली. मंडणगड, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, रत्नागिरी, लांजा व राजापूर या तालुक्यांमध्ये चालू आठवड्यात एकाही गावाची टंचाईग्रस्तांमध्ये वाढ झालेली नाही. दापोली तालुक्यात एका गावातील एक वाडी, गुहागरमध्ये ३ वाड्यांची व चिपळूणमध्ये २ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे.
गतवर्षी आजच्या दिवशी १२३ गावांतील २७७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु होती. या टंचाईग्रस्तांना २८ टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, चालू आठवड्यामध्ये गतवर्षीपेक्षा टंचाईग्रस्तांमध्ये १३ वाड्या जास्त आहेत.
दरवर्षी त्या-त्याच गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. मात्र तरीही त्या गावांसाठी कायमस्वरुपी पर्याय शोधण्याबाबत लोकप्रतिनिधी उदासिन आहेत. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठवणुकीचा विचार होत नाही त्यामुळे उन्हाळ्यात टँकरचा आधार घ्यावा लागतो. (शहर वार्ताहर)