वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पडझडीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:09+5:302021-07-18T04:23:09+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याने आता अनेक भागात पडझडीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक घरांचे नुकसान ...

वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पडझडीला प्रारंभ
रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याने आता अनेक भागात पडझडीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक घरांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. गेल्या २४ तासांत एकूण ६१७.८० मिलिमीटर तर सरासरी ६८.६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर दोघांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खेड येथे ११ रोजी कामाच्या ठिकाणी अपघात होऊन अवचित चव्हाण जखमी झाला होता, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथील सहदेव खेमाजी सोंड्ये यांचा नदीच्या प्रवाहात वाहत जावून मृत्यू झाला.
शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. मात्र, दुपारनंतर पुन्हा जोरदार पडण्यास सुरूवात झाली. मात्र, पाऊस सरींवर पडत असल्याने अधुनमधून विश्रांतीही सुरू होती.
रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील अनंत मांजरेकर यांच्या घराचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यांना शेजारी असलेल्या संदेश मांजरेकर यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच वेतोशी येथील शारदा रेवाळे यांच्या घराची पडवी अतिवृष्टीमुळे खचली आहे. त्यांचे घर नदीकिनारी असल्याने त्यांना शेजारी स्थलांतरित होण्याची सूचना दिली असल्याची माहिती रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिली.