कृषी विभाग प्रभारींच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:31 IST2021-09-19T04:31:55+5:302021-09-19T04:31:55+5:30

राजापूर : तालुका कृषी अधिकारी पदासह या कार्यालयातील तब्बल १७ पदे रिक्त असल्याने त्याचा मोठा फटका राजापूर तालुक्यातील ...

In the hands of the Department of Agriculture | कृषी विभाग प्रभारींच्या हाती

कृषी विभाग प्रभारींच्या हाती

राजापूर : तालुका कृषी अधिकारी पदासह या कार्यालयातील तब्बल १७ पदे रिक्त असल्याने त्याचा मोठा फटका राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या या विभागाचा कारभार प्रभारींमार्फत हाकला जात आहे, तसेच रिक्त पदांमुळे कामाचा खोळंबा होत आहे.

घरांचे अंशतः नुकसान

देवरुख : कुंभारखाणी खुर्द येथील प्रभाकर रामचंद्र मिरगल यांच्या घराचे पावसामुळे अंशतः ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील शरद धोंडू पालकर यांच्याही घराचे पावसामुळे अंशतः नुकसान झाले आहे. इतर ठिकाणी पावसाने नुकसान झाले आहे.

पीक हातचे जाण्याची भीती

चिपळूूण : यावर्षी जोरदार पाऊस पडला असून, अद्याप पावसाचा लपंडाव सुरूच आहे. सध्या ग्रामीण भागात हळवी भातशेती पसवली असून, असाच पाऊस सुरू राहिला, तर भाताचे पीकही हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. काही ठिकाणी भातशेती कापण्याजोगी झाली आहे.

बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी

लांजा : गणेश विसर्जन नंतर ही लांजा बाजारपेठ परिसरात ग्राहकांची गर्दी कायम असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मास्कशिवाय फिरणाऱ्यांविरोधात पोलीस यंत्रणेने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला आहे.

अनेक दिवस पथदीप बंद

खेड : नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी चौक ते जनावरांचा दवाखाना रस्त्यावरील पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांना चाचपडत जावे लागते. पथदीप बंद असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

थकबाकी वसुली मोहीम

गुहागर : तालुक्यात तब्बल अडीच कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर थकबाकी भरा, अन्यथा वीजपुरवठा तोडण्यात येईल, अशी थकबाकी वसुलीची मोहीम महावितरणने सुरू केल्याने अनेकांचे मीटर बंद होत आहेत.

Web Title: In the hands of the Department of Agriculture