हाहा:कार उडवणारी दुसरी लाट शांत होतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST2021-07-18T04:22:47+5:302021-07-18T04:22:47+5:30

गतवर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांची प्रतिकारशक्ती अधिक असल्याने त्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक नव्हता. मात्र, दुसऱ्या लाटेत एप्रिल, ...

Haha: The second wave blowing the car calms down | हाहा:कार उडवणारी दुसरी लाट शांत होतेय

हाहा:कार उडवणारी दुसरी लाट शांत होतेय

गतवर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांची प्रतिकारशक्ती अधिक असल्याने त्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक नव्हता. मात्र, दुसऱ्या लाटेत एप्रिल, मे आणि जून महिन्यात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बालकांचे प्रमाणही अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. बालकांनी कोरोनाशी लढा दिला होता. सुदैवाने सर्वच बालके सुखरूपपणे कोरोनावर मात करून घरी परतली आहेत. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावात दगावलेल्या रुग्णांमध्ये पन्नाशीनंतरच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. कोरोना प्रादुर्भावामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा पुढे असल्याने ही बाब चिंतेची आहे. पण आता परिस्थितीत थोडा बदल होत आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मार्च महिन्यानंतर प्रथमच असा दिलासा मिळत आहे. अर्थात दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा कहर पाहता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लोकांनी जागृत राहण्याची आवश्यकता आहे.

आजारी, मधुमेह तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना कोरोनाची भीती जास्त असली तरी कोरोनाची काळजी न घेतल्याने कोरोनाबाधित होण्याचे तरुणांमधील प्रमाणही अधिक असल्याचे एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मार्चपर्यंत कोरोनाची स्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर एप्रिलपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. तरीही लहान मुलांमध्ये प्रतिकारकशक्ती अधिक असल्याने त्यांचा कोरोनापासून बचाव झालेला आहे. जिल्ह्यात केवळ एका बालकाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन बालकांसाठी रत्नागिरीत कोविड सेंटरही उभारण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात एप्रिल, मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. तरीही जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच गेला. या कालावधीत प्रशासनाकडून कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे दररोज ५०० पेक्षा अधिक बाधित रुग्ण सापडत होते. मे महिनाभरात १४,१५६ रुग्ण सापडले होते. मात्र, त्यामुळे मे महिन्यापेक्षा जून महिन्यात सर्वाधिक १७,२०६ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला होता. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेवर जास्त भर देण्यात आला आहे. लोकांनाही लसीकरणाचे महत्त्व समजू लागल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे.

राज्यात कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अधिक रुग्ण वाढल्याने चिंतेत भर पडली हाेती. रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे शासनाच्या लक्षात येताच रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता आणलेली नाही. आजही हॉटेल्स बंद आहेत. हॉटेलमधून केवळ पार्सलसेवा सुरू ठेवण्यात आलेली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेला प्राधान्य देण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता जिल्ह्यातील व्यवसाय केवळ दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू असतात. शासकीय कार्यालयांमध्येही कर्मचाऱ्यांची ५० टक्केच उपस्थिती आहे. सर्व शाळाही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. गेले वर्षभर अभ्यासक्रम ऑनलाइन पध्दतीने सुरू आहे.

शिमगोत्सवानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रत्येक गावात कोरोना तपासणी मोहीम राबविण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह दर १७ टक्क्यांपर्यंत गेला होता. तो आता ६ टक्क्यांवर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. जून महिन्यात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आल्याने रुग्ण अधिक सापडत होते. मात्र, मागील आठवड्यापासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने बाधित रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाबाधित एकूण रुग्ण- ६७,९७६ पाॅझिटिव्हिटी दर- ५.७१ टक्केे

बरे झालेले एकूण रुग्ण - ६२,३९८ बरे होण्याचा दर - ९१.७९ टक्के

एकूण मृत्यू - १,९३८ मृत्युदर - २.४७ टक्के

जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची तालुकानिहाय संख्या

तालुका रुग्ण

रत्नागिरी ६३९

खेड १७५

गुहागर १४४

दापोली १६९

चिपळूण ३७३

संगमेश्वर १७६

लांजा १००

राजापूर ११९

मंडणगड २९

Web Title: Haha: The second wave blowing the car calms down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.