२२७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई
By Admin | Updated: June 13, 2015 00:18 IST2015-06-12T22:56:18+5:302015-06-13T00:18:01+5:30
रत्नागिरी जिल्हा : दमदार पाऊस नसल्याने संकट कायम

२२७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई
रत्नागिरी : जिल्ह्यात ९८ गवांतील २२७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. या टंचाईग्रस्तांना केवळ २५ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा असल्याची ओरड सुरु आहे़
जिल्ह्यात पावसाळा सुरु झाला असला तरी अजूनही पाणीटंचाई कमी झालेली नाही. उलट दिवसेेंदिवस टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये भर पडत आहे. भयंकर उकाडा होत असून, पाण्याची पातळी खालावलेली आहे. जिल्ह्यात गतवर्षी या दिवसांमध्ये १२२ गावातील २९० वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु होती. या टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करताना शासनाची दमछाक झाली होती. मात्र, गतवर्षीची पाणी टंचाईची स्थिती पाहता यंदाची पाणीटंचाईग्रस्तांची संख्या खूप कमी आहे. तरीही लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासकीय ११ टँकर्स आणि खासगी १४ टँकर्स अशा एकूण २५ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हा पाणी पुरवठाही अपूर्ण होत असल्याने लोक हैराण झाले आहेत. शासनाकडून केवळ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. या पाणीटंचाईमुळे गुरांची तडफड सुरु आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये भीषण वास्तव असून दरवर्षी पाणी टंचाई दूर करण्याच्या घोषमा हवेत विरल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र टंचाईबाबतअद्यापही पूर्ण उपाय करण्यात आलेले नसल्यानेच टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या वाढत आहे. (शहर वार्ताहर)
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे, वाड्या व टँकर्स पुढीलप्रमाणे
तालुका गावे वाड्या टँकर्स
मंडणगड ४ ८ १
दापोली १० २० २
खेड २१ ४० ६
गुहागर ९ ३८ २
चिपळूण १२ ४२ ३
संगमेश्वर १९ २५ ३
रत्नागिरी ५ १० ३
लांजा १० २२ ३
राजापूर ८ २२ २
एकूण-- ९८ २२७ २५