गोपाळगड संरक्षित; मात्र सरकारचे अजूनही दुर्लक्षच
By Admin | Updated: January 30, 2015 23:10 IST2015-01-30T23:05:31+5:302015-01-30T23:10:59+5:30
हालचाल नाही : केवळ घोषणा; अंमलबजावणी नाही, दुसऱ्या वर्धापनदिनाची प्रतीक्षा असतानाच...

गोपाळगड संरक्षित; मात्र सरकारचे अजूनही दुर्लक्षच
गुहागर : अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला खासगी मालकीमध्ये अडकला आहे. शासनाने हा किल्ला संरक्षित स्मारक घोषित करुन काही वर्षे लोटली तरी त्यानंतर कोणतीही हालचाल नाही. यासाठी गुहागर येथील शिवतेज फाऊंडेशन ही सामाजिक संस्था पुढे सरसावली आहे. १९ फेब्रुवारी या संस्थेच्या दुसऱ्या वर्धापनदिनी गोपाळगड किल्ला शासनाने ताब्यात घ्यावा, या आशयाचे पन्नास हजार सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे.
संस्था स्थापनेपासून मागील दोन वर्षात शिवतेज फाऊंडेशनने ऐतिहासिक प्रबोधनासाठी व खासकरुन गोपाळगड खासगी मालकीतून मुक्त व्हावा, यासाठी शिवतेज फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. संकेत साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली निवडक कार्यक्रम राबविले. यामध्ये गोपाळगडावरील स्वच्छता मोहीम तसेच प्रख्यात व्याख्याते नितीन बाणगुडे पाटील व अन्य व्याख्यात्यांची निवडक व्याख्याने आयोजित केली. यापुढे गोपाळगडला खासगी मालकीतून मुक्त करुन गडप्रेमी व पर्यटकांसाठी गोपाळगड खुला करावा, यासाठी फाऊंडेशनने कंबर कसली आहे.
याबाबत माहिती देताना अॅड. संकेत साळवी म्हणाले की, गोपाळगडावर गेली अनेक वर्षे शासनातर्फे झेंडा वंदन होत असते. मात्र, याची सरकार दरबारी नोंद केली जात नाही. यापुढे ही नोंद व्हावी, याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे चर्चा झाली आहे. जनभावना लक्षात घेऊन शासनाने कायदेशीर प्रक्रियेमध्ये न अडकता आज ज्या ठिकाणी गोपाळगड उभा आहे ते क्षेत्र शासनाने संपादित करावे, अशी आमची मागणी आहे. यावेळी फाऊंडेशनचे डॉ. बाळासाहेब ढेरे, संतोष वरंडे, नीलेश गोयथळे, मनोज बारटक्के, अलंकार विखारे आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण असणारा हा किल्ला सरकारी अनास्थेमुळे युनूस मणियार नावाच्या खासगी व्यक्तीच्या मालकी हक्काखाली गेला आहे. सागरी सुरक्षेसाठी बांधलेल्या या किल्ल्याची काही तटबंदी तोडण्यात आली आहे. भविष्यात या किल्ल्याचा उपयोग खासगी मालकांकडून हॉटेल व्यवसाय व अन्य व्यापारांकरिता होऊ शकेल, अशी भीती शिवप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा किल्ला शासनाने त्वरित ताब्यात घ्यावा, अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. या स्मारकाबाबत केवळ घोषणाबाजी झाली. मात्र, पुढे स्मारकाच्या दृष्टीने शासनाकडून अंमलबजावणी झाली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
या निवेदनावर ५० हजार सह्यांसाठी मोहीम राबवली जात असून, १९ फेब्रुवारीला शिवतेज फाऊंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनी शृंगारतळी तसेच गुहागरमधून शिवाजी चौक ते तहसील कार्यालय, अशी अस्मिता रॅली काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांनाही देण्यात येणार असल्याचे अॅड. संकेत साळवी यांनी सांगितले.