भुरट्या चोरट्याला अखेर गजाआड केलेच

By Admin | Updated: August 3, 2014 22:43 IST2014-08-03T21:19:05+5:302014-08-03T22:43:59+5:30

चाफेरीतील घटना : पोलिसी खाक्याने चोरटा बोलू लागला...

The ghostly thief will finally go away | भुरट्या चोरट्याला अखेर गजाआड केलेच

भुरट्या चोरट्याला अखेर गजाआड केलेच

सुभाष कदम - चिपळूण ,, वाढती महागाई, बेरोजगारी यांमुळे आजकाल छानछोकी जीवन जगण्यासाठी बनवाबनवी, फसवणूक किंवा भुरट्या चोऱ्या करण्यावर तरुणांचा अधिक भर असतो. चोरीच्या माध्यमातून फुकटचे पैसे मिळतात आणि समाजात ‘हायटेक’ जीवन जगता येते. ‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशा स्थितीत ताठ मानेने हे तरुण फिरत असतात.
गावागावात किंवा लहान शहरात किरकोळ स्वरूपाच्या चोऱ्या करुन आपला उदरनिर्वाह करणारे महाभाग समाजात कमी नाहीत. गरज म्हणून किंवा स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी चोऱ्या करता करता या दलदलीत तरुण कधी फसतात, याची जाणीव त्यांना होत नाही. ही सवय पुढे अंगवळणी पडते. मौजमजा करताना ही तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी जातात. आपली हौस व व्यसन पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्यांची पावले चोऱ्या करण्याकडे वळतात. अगदी तांब्याच्या तारेपासून खणती, कुदळ, फावडेही चोरुन विकणारी मंडळी ग्रामीण भागात आहेत. काही वेळा ते पकडले जातात. थोड्या शिव्या मिळतात. समाजात छी-थू होते. काही वेळा समाजाची बैठक घेऊन चोरट्याला पाठीशी घातले जाते, तर बहुतांश वेळा समाज अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. या संधीचा सुधारण्यासाठी उपयोग करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा गैरफायदा घेत निर्ढावल्यासारखे अनेक कृत्ये केली जातात. खरे तर एखादी गोष्ट नजरेसमोर आल्यावर ती समाजाने स्पष्टपणे विचारायला हवी. वेळप्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासून संबंधिताला शिक्षा द्यायला हवी किंवा पोलिसांच्या स्वाधीन करायला हवे. पण, समाज कठोर भूमिका स्वीकारत नाही.
रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी या डोंगराळ दुर्गम भागात अशीच घटना घडली होती. चाफेरी - गवळीवाडी येथे अरविंद यशवंत केदारी हा तरुण आपल्या कुटुंबासह राहात होता. दररोज तो नित्यनियमाने आपल्या कामासाठी घराबाहेर पडत असे. त्याच्या मागे त्याची पत्नीही मुलींना शाळेत सोडून कामावर जात असे. संपूर्ण दिवसभर त्यांचे घर बंद असायचे. गावात कोण कुठे जातो? कोणाचे घर बंद आहे? याची उठाठेव करणारी काही मंडळी असते. त्यांच्या गैरहजेरीत आपले इप्सित साध्य करणारी मंडळी असते. या गावात मराठवाडीत राहणारा सचिन गणपत बैकर हा भुरटा चोर होता. त्याला वाडीतील घराबद्दल खडानखडा माहिती होती.
१८ फेब्रुवारी २०१० चा तो दिवस! हा दिवस अरविंद केदारी यांच्या दृष्टीने काळा दिवस होता. नेहमीप्रमाणे केदारी आपली पत्नी सारिका व मुलींसह सकाळी ८.३० वाजता घरातून बाहेर पडले. मुलींना शाळेत सोडून पती - पत्नी कामावर निघून गेले. जाताना त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या घराला कुलूप घातले होते. ही संधी सचिन बैकरने साधली. गावात दुपारच्या वेळी नीरव शांतता असते. घरात असलेली वृद्ध मंडळी वामकुक्षी घेत असल्याने गावात सामसूम होती. या संधीचा फायदा सचिनने उठवला. आजूबाजूचा कानोसा घेत त्याने केदारी यांच्या घराच्या जेवणाच्या मागच्या पडवीची कौले काढून तो आत उतरला. त्याने संपूर्ण घराची झाडाझडती घेतली. सामानाची उघडझाप केली. सारे घर पालथे घालून सामान अस्ताव्यस्त टाकले. परंतु, त्याच्या हाताला काही लागेना. घरात काहीच नसल्याने त्याची नजर मिळेल ते शोधण्यासाठी सैरभैर झाली होती. अखेर त्याचे लक्ष भिंतीतील कपाटाकडे गेले. त्याने त्या कपाटाची कडी उचकटून त्याचा रापाचापा घेतला. त्याला आतमध्ये एक डबी सापडली. त्या डबीत अडीच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा होत्या. त्याची त्यावेळची किंमत ४ हजार होती. ही रिंगाची डबी घेऊन त्याने तेथून पोबारा केला.
नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ वाजता सारिका केदारी आपल्या मुलींना घेऊन शाळेतून घरी परतली. कुलूप उघडून त्यांनी आत प्रवेश केला आणि त्यांनी घरातील परिस्थिती पाहून त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्या घरात सामानाची झालेली पडझड आणि विस्कटलेले कपडे पाहून घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. शोधाशोध करताना भिंतीतील कपाटातील सोन्याच्या रिंगा असलेली डबी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सायंकाळी उशिरा केदारी घरी आल्यावर सारिकाने घडला वृत्तांत पतीला सांगितला आणि त्यांच्या मनाला हूरहूर लागली.
सायंकाळी केदारी यांनी जयगड पोलीस ठाण्यात घरफोडीची खबर दिली. जयगड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी गुन्हा दाखल केला आणि घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा भुरटा चोर असावा, हे पोलिसी नजरेने बरोबर हेरले. त्यादृष्टीने तपास सुरु झाला. सहायक पोलीस निरीक्षक कदम यांनी हवालदार ए. यु. विचारे यांच्याकडे हा तपास सोपवला. त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. या भागात भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. हवालदार विचारे माहिती घेत असताना त्यांच्यासमोर सचिन बैकर याचे नाव पुढे आले. यापूर्वी चोरीचे गुन्हे केल्याने सचिनचे नाव पोलीस रेकॉर्डवर होतेच. त्याला प्रथम संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक कदम यांनी त्याची चौकशी सुरु केली. परंतु, बनेल सचिनने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. कदम यांनी परिस्थितीचा अंदाज घेत पोलिसी खाक्या दाखवला. तसा सचिन पोपटासारखा बोलू लागला. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. रत्नागिरी न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु असताना अनंत गोविंद जाधव, वनिता दिलीप भोजने, सारिका अरविंद केदारी, तपासिक अंमलदार ए. यु. विचारे यांच्या साक्षी सरकारी वकिलांनी घेतल्या. यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी सरकार पक्षाला सहाय्यभूत ठरल्या. सहायक सरकारी वकील आर. के. साळी यांनी फिर्यादी पक्षातर्फे युक्तिवाद केला. २५ आॅगस्ट २०१० रोजी रत्नागिरी न्यायालयात या चोरीप्रकरणी निकाल जाहीर झाला. आरोपी सचिन याला १ वर्षाची पोलीस कोठडी व ९०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

Web Title: The ghostly thief will finally go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.