वायूच्या वासाने चौघे गुदमरले
By Admin | Updated: November 21, 2015 23:58 IST2015-11-21T23:06:36+5:302015-11-21T23:58:18+5:30
रत्नागिरीतील घटना : महिलांच्या सतर्कतेने जीवित हानी टळली

वायूच्या वासाने चौघे गुदमरले
रत्नागिरी : वायूच्या रिकाम्या टँकरची साफसफाई करत असताना वायूच्या वासाने चौघे गुदमरुन बेशुद्ध झाल्याची घटना शनिवारी सकाळी रत्नागिरीतील मिरकरवाडा परिसरातील एस. केअर मरीन कंपनीनजीक घडली. या चौघांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत. रात्री उशिरापर्यंत टँकरमध्ये कोणत्या प्रकारचा वायू होता हे समजू शकले नाही.
शनिवारी सकाळी टँकर (एमएच ०९ बीसी ५०००) हा मिरकरवाडा परिसरातील एस. केअर या मरीन कंपनीनजीक उभा होता. टँकरची आतून सफाई करण्यासाठी प्रसाद उर्फ बबलू जगदीश बिर्जे (३२), अलिसाब मगदूम पटेल (३२, दोघेही रा. मुरुगवाडा), संतोष रमेश राठोड (३०, भगवती बंदर) व शरीफ चांदसाब पटेल (३२, मुरुगवाडा) हे उतरले होते. टँकरचे दोन कप्पे धुवून झाले असता जगदीश, अलिसाब व संतोष हे टँकरच्या तिसऱ्या कप्प्यामध्ये उतरले या कप्प्यामध्ये वायू शिल्लक असल्याने तिघेही तेथेच गुदमरुन बेशुद्ध पडले. बराच काळ हे तिघेही बाहेर न आल्याने शरीफ पटेल त्यांना पाहण्यासाठी या कप्प्यामध्ये उतरला असता तोही बेशुद्ध पडला. ही गोष्ट तेथीलच महिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी परिसरातील नागरिकांना याची कल्पना दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या चारही जणांना बाहेर काढण्यात आले. (वार्ताहर)