राममंदिरासाठी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:26+5:302021-04-24T04:31:26+5:30
देवरुख : अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी शहर परिसरातील आठ विविध मंडळांतर्फे सुमारे २० लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आला ...

राममंदिरासाठी निधी
देवरुख : अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी शहर परिसरातील आठ विविध मंडळांतर्फे सुमारे २० लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आला आहे. राममंदिर निर्माण समितीच्या कार्यकर्त्यांनी देवरुख, सायले, ताम्हाणे, कोंडगाव, देवळे, तुळसणी परिसरातून १८ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचून हा निधी गोळा केला आहे.
भराव हटविण्याचे काम
चिपळूण : बहादूरशेख येथील वशिष्ठी नदीतून गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. पुलाखालील भराव ४०० टनाच्या तीन क्रेनच्या माध्यमातून काढण्यास प्रारंभ झाला आहे. नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करावे, ही मागणी होत असल्याने आता पावसाळ्यापूर्वी भराव काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मागासवर्गीयांना दिलासा
रत्नागिरी : पदोन्नतीत आरक्षित पदे रिक्त ठेवून अन्य पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मागासवर्गीय कोट्यातील ३३ टक्के आरक्षित पदे रिक्त ठेवून उर्वरित पदे खुल्या प्रवर्गातून भरली जाणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
समन्वयाचा अभाव
मंडणगड : राज्यात नव्याने लागू करण्यात आलेल्या कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून घेण्यासाठी पोलीस, आरोग्य आणि महसूल यंत्रणा प्रयत्नशील आहे. मात्र या तीनही यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून या नियमावलीला धुडकावले जात आहे.
तपासणी न करता प्रवास
रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. परंतु काही अधिकारी एक-दोन दिवसाच्या सुटीच्या कालावधीत इतर शहरात जाऊन येत आहेत. त्यांची तपासणी होत नसल्याने कोरोना फैलावाचा धोका वाढला आहे.
घरांना धोका
देवरुख : शहरानजीकच्या मुरादपूर येथे अहोरात्र सुरू असलेल्या सुरुंगामुळे सर्व वाड्यांमध्ये घरांना धोका निर्माण झाला आहे. लबद्याचा माळ, उलटाचा पऱ्या, बेडुक तळी आदी ठिकाणी काळा दगड काढण्यासाठी सुरुंग लावले जात आहेत. त्यामुळे मुरादपूर येथील मधलीवाडी, चाचेवाडीतील घरांना धोका निर्माण झाला आहे.
वणव्यांचे प्रमाण वाढले
खेड : खेड तालुक्यात काही भागात वणव्यांना सुरुवात झाली आहे. सध्या उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे वणव्यांचे प्रमाणही वाढले आहे. यात तालुक्यातील अनेक भागांमध्ये बागायतीला धोका निर्माण झाला असून आंबा, काजू कलमे होरपळण्याच्या घटना घडल्या आहेत.
गतिरोधकांवर पांढरे पट्टे
देवरुख : संगमेश्वर - देवरुख मार्गावरील गतिरोधकांवर अखेर पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. संगमेश्वर - कोल्हापूर या राज्यमार्गाच्या रुंदीकरण, डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांवर वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.